आधीच्या सरकारमध्येही लोककल्याणकारी योजनांचे आदेश निघत होते. मात्र, शासकीय यंत्रणेमधील दलालांमुळे योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नव्हता. आमच्या सरकारने केलेल्या डिजिटायझेशनमुळे आता सर्व यंत्रणा पारदर्शक झाली असून शासकीय योजनेतून दलाल हद्दपार पार झाले आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी बुधवारी केला. अनुलोम संस्थेच्या वतीने सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे, महिला बचत गट यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेत फडणवीस बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, आधीच्या सरकारमध्ये शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग शोधावा लागत होता. सरकारी योजना म्हणजे दलाल या समीकरणाची भीती सर्वसामान्यांना वाटत होती. सरकारची योजना दलालच संपवून टाकायचे. हे चित्र कोणीही बदलू शकणार नाही, असे सर्वाना वाटत होते. मात्र, विद्यमान सरकारने याबाबत विचार करून सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. समाजात ८० टक्के सज्जन लोक आहेत. उर्वरितांची संख्या केवळ २० टक्केच आहे. त्यामुळे सज्जन लोकांना संघटित करण्यासाठी हे सरकार काम करेल. सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील. सज्जन शक्तीला वाटत असणारी दलालांची भीती डिजिटायझेशनमुळे संपली असून शासकीय योजनेतून दलाल हद्दपार झाले आहेत. गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास दलालांची आवश्यकता राहणार नाही. मेळाव्यात सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे, महिला बचत गट यांची एकदिवसीय कार्यशाळा झाली. त्यात दोन हजार संस्थांचे चार हजार प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या कृषी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता अशा विविध विभागांबरोबरच स्मार्ट सिटी, मेट्रो रेल यांचे विशेष स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक अनिल मोहिते यांनी केले. आभार रवींद्र दहाड यांनी मानले.