सध्या दहावी, बारावी आणि नीट, जेईई, सीईटीसारख्या परीक्षांच्या निकालांचे दिवस आहेत. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये पुढील शिक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. दहावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान आणि बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, सनदी लेखापाल, स्पर्धा परीक्षा, परदेशी भाषा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भरपूर पर्यायांमुळे काही वेळा यातले काय निवडावे हा संभ्रम निर्माण होतो. त्यातून काही वेळा मित्र-मैत्रिणी, बहीण-भावंडे यांपैकी कोणी निवडली म्हणून करीअरची एखादी विशिष्ट वाट निवडली जाते. कधी तरी कोणी तरी सांगितले म्हणून करीअर काय करावे हे ठरवले जाते. या प्रक्रियेतून निवडलेली वाट हमखास यश देणारी असेलच असे नाही. त्यामुळे आपला कल ओळखणारी, व्यवस्थित दिशा देणारी एखादी मार्गदर्शक व्यक्ती असणे आवश्यक ठरते. अशा वेळी ‘करीअर काऊन्सिलिंग’ अर्थात समुपदेशन कामी येते. हे समुपदेशन म्हणजे काय, ते कसे केले जाते, समुपदेशनाची गरज कोणाला आहे, ते किती उपयुक्त ठरते याबाबत या क्षेत्रातील जाणकार आणि करीअर मार्गदर्शनक विवेक वेलणकर यांच्याशी साधलेला संवाद. * प्रश्न - समुपदेशनासाठी येणारे विद्यार्थी नेमके कोण असतात? उत्तर - दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा देऊन निकालाच्या प्रतीक्षेत असलेले किंवा निकाल लागून गुणपत्रिका हातात असलेले विद्यार्थी समुपदेशनासाठी येतात. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्थातच जास्त येतात, त्या तुलनेने बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कमी येतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी पुढे काय करायचे याबाबत अजिबात निर्णय न झालेले असतात. काही मात्र अनेक पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडावा याबाबत संभ्रम असलेले असतात. * प्रश्न - समुपदेशन करण्याची तुमची पद्धत काय? उत्तर - विद्यार्थी आणि अनेकदा पालकदेखील समोर दिसणाऱ्या विविध पर्यायांमधील कोणता पर्याय निवडावा याबाबत संभ्रमात असतात. अशा वेळी त्या विद्यार्थ्यांची नेमकी आवड काय आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. त्यासाठी विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या आवडीनिवडी, कल समजून घेणे आवश्यक असते. किती गुण मिळाले हा मुद्दा इथे अनावश्यक असतो, कारण मिळणारे गुण आणि आवडनिवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही. केवळ लेखी परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असे त्या काळात एक विद्यार्थिनी पालकांसह समुपदेशनासाठी आली. तिला तब्बल नव्वद टक्के गुण मिळाले होते, हुशार होती मात्र करीअरचा कोणता मार्ग निडावा याबाबत तिचा निर्णय होत नव्हता. त्यावेळी तिच्याशी गप्पा मारून समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तिला भौतिक आणि रसायनशास्त्र आवडत नाही पण गणित आवडते हे समजले. तिला वाणिज्य शाखा निवडून सनदी लेखापाल, कंपनी सचिव हे मार्ग सुचवले. ती विद्यार्थिनी दोन्ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली. मुद्दा एवढाच की आवड निवड समजली तर पर्याय समोर येतात. * प्रश्न - बारावीनंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय असतात, त्यांची उत्तरे त्यांनी कशी शोधावी? उत्तर - बारावीनंतर करीअरच्या वाटा खऱ्या अर्थाने समोर येतात. त्यामुळे विज्ञान शाखेतून आलेल्या विद्यार्थ्यांला अभियांत्रिकीला जावे का, त्यातील कोणती शाखा निवडावी, महाविद्यालय कोणते निवडावे असे अनेक प्रश्न असतात. अशा वेळी विद्यार्थ्यांनी त्या शाखेतून अभियांत्रिकी पूर्ण केलेल्या, नोकरी करणाऱ्या किंवा पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलावे. त्यातून त्या क्षेत्राला असलेली मागणी, त्यातील संधी आणि भवितव्य यांची कल्पना येऊ शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र ओळखण्यास मदत करणे आणि विचारांना योग्य दिशा देणे हे समुपदेशनात महत्त्वाचे ठरते. * प्रश्न - करीअर निवड प्रक्रियेमधील मुख्य अडचण काय दिसते? उत्तर - मुख्य अडचण ही की विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही पुरेशी माहिती नसते. नीट किंवा जेईईसारख्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वर्ष ‘रिपीट’ करावे का हे विचारण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात. त्यावेळी पुढील वर्षी असलेली स्पर्धा, गुण कमी पडण्याच्या कारणांची मीमांसा अशा अनेक गोष्टींवर त्यांना बोलते करावे लागते. आयआयटीचा प्रवेश हुकला म्हणून वर्ष ‘रिपीट’ करण्याचा विचार करणाऱ्यांना मिळेल त्या महाविद्यालयात पदवी घेऊन एम. टेक. साठी आयआयटीची प्रवेश परीक्षा द्या हा पर्याय सुचवावा लागतो. निवडलेल्या शाखेतील अभ्यासक्रम, ते देणाऱ्या संस्था याबाबत माहितीचा अभाव दिसतो. * प्रश्न - समुपदेशन हा यशाचा हमखास मार्ग आहे का? उत्तर - समुपदेशक हा विद्यार्थी आणि पालक यांना त्यांच्या संभ्रमातून बाहेर काढण्याचे काम करतो. समुपदेशकाने दिलेल्या सल्ल्याचा प्रत्यक्ष अवलंब, आपली वाट निवडल्यानंतर त्यात घेतलेले कष्ट आणि मेहनत हीच विद्यार्थ्यांना खरे यश मिळवून देते. * प्रश्न - यंदा दहावी-बारावी होणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? उत्तर - सर्वप्रथम स्वतला काय आवडत नाही ते ओळखा. मग काय आवडते ते ओळखा. ज्या क्षेत्रात जायचे आहे त्याची पूर्ण माहिती घ्या. त्याचा खर्च किती येईल याचा अंदाज घ्या. भविष्यात त्यात नोकरीच्या संधी आहेत किंवा नाही हे तपासा. रुळलेल्या वाटांपेक्षा वेगळ्या वाटांचा शोध घ्या.