शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला (बीएड) यावर्षी मिळालेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमासाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) पुन्हा घेण्याचा विचार उच्च शिक्षण संचालनालयाकडून केला जात आहे.
यावर्षी बीएड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला आहे. बीएडच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी शनिवारी झाली. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीअखेर बीएड अभ्यासक्रमाच्या एकूण उपलब्ध जागांपैकी जवळपास ७० टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला इच्छुक असणारे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी पुन्हा सीईटी घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. पी. आर. गायकवाड यांनी सांगितले.
याबाबत गायकवाड म्हणाले,‘‘आतापर्यंत सत्तर टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेशाची अजून एक फेरी व्हायची आहे. त्यामुळे नेमक्या किती जागा रिक्त राहतील, हे ऑगस्ट अखेपर्यंत कळेल. मात्र, जागा रिक्त राहू नयेत आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी या हेतूने पुन्हा एकदा सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाला आम्ही पाठवणार आहोत. त्याचबरोबर खासगी बीएड महाविद्यालयांवर शुल्क नियंत्रण समिती बसवण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्याबाबतही लवकरच कार्यवाही होईल. विद्यार्थी आणि महाविद्यालयांचे व्यवस्थापन या दोन्हीचा विचार करून या समितीची रचना करण्यात येणार आहे. ज्या संस्थाना महाविद्यालये सुरू ठेवायची नाहीत, त्यांनी राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण संस्थेकडे (एनसीटीई)े प्रस्ताव पाठवावेत.’’