भूसंपादनासाठी १३० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता पुणे : चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाण पुलासाठी पूर्ण भूसंपादन झाल्यानंतरच उड्डाण पुलाचे काम सुरू होईल, अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतल्यानंतर केवळ चार टक्के भूसंपादनाअभावी हा प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली होती. भूसंपादनासाठी दुसऱ्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी महापालिकेने मंजूर केला आहे. या निधीतून संबंधितांना रोख मोबदला देणे शक्य होणार असून उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळणार आहे. चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात करण्यात आले. मात्र भूमिपूजनानंतरही उड्डाण पुलासाठी आवश्यक असलेली जागा महापालिकेच्या ताब्यात आली नसल्याची वस्तुस्थिती काही दिवसांनंतर पुढे आली. उड्डाण पुलासाठी १३ हेक्टर जागेचे संपादन करणे आवश्यक आहे. यातील सहा हेक्टर एवढी जागा महापलिकेच्या ताब्यात आली होती. उर्वरित जागा मालकांनी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे, पण त्यासाठी नुकसानभरपाई म्हणून त्यांना रोख मोबदला हवा आहे. त्यासाठी किमान साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये लागणार असून एवढा निधी कसा उभा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे भूसंपादन करणेही प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरले होते. महापालिकेने पहिल्या टप्प्यात भूसंपादनासाठी ८६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. तर राज्य शासनाने विशेष बाब म्हणून १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग मिळाला होता. महापालिकेनेही उड्डाण पुलासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. उड्डाण पुलासाठी ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यामुळे कामे तत्काळ सुरू होतील, अशी शक्यताही वर्तविण्यात येत होती. मात्र शंभर टक्के भूसंपादन झाल्यावरच कामे सुरू करण्यात येतील, अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने घेतली होती. त्यात पाच टक्के भूसंपादन करण्यास काही जागा मालकांनी प्रारंभी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काम रखडणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. भूसंपादनापोटी मिळकतदारांना चटई क्षेत्र निर्देशांक (प्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसाय) किंवा हस्तांतर विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स- टीडीआर) देण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाने पुढे केला होता. मात्र रोख मोबदला द्यावा, अशी मागणी जागा मालकांकडून घेण्यात आली होती. मात्र त्यासाठी लागणारा निधी कसा उभारायचा हा प्रश्न उपस्थित झाला होता. दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी १३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात साधारणपणे दहा टक्के भूसंपादन करण्यात येणार असून त्यामध्ये ७९ जागामालकांचा समावेश आहे. या अंतर्गत ५.५७ हेक्टर जागा मालाकंना रोख स्वरूपात १३० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. उर्वरित जागा मालकांना टीडीआर किंवा एफएसआयच्या माध्यमातून मोबदला दिला जाणार आहे. खासगी जागेसाठी मोबदला उड्डाण पुलासाठी आवश्यक असलेल्या एकूण जागेपैकी काही जागा शासकीय तर उर्वरित खासगी मालकांची आहे. खासगी जागेत ६७ घरे आणि दोन बंगल्यांचा समावेश आहे. त्यापैकी ५७ मिळकती संपादित करण्यासाठी ५४ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे, तर दहा घरांसाठी १९ कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे.