‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) नियामक मंडळावर ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा, ज्येष्ठ सिनेपत्रकार भावना सोमय्या आणि ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक बी. पी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले अभिनेते गजेंद्र चौहान आणि मंडळावरील चार सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करीत विद्यार्थ्यांनी १४० दिवस संप केला होता. सरकारने नियुक्त केलेल्या समितीतील अभिनेत्री पल्लवी जोशी, दिग्दर्शक संतोष सिवन आणि जाहनू बरुआ या सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भावना सोमय्या या ज्येष्ठ सिनेपत्रकार असून भारतीय चित्रपटांवर आधारित १२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विनोदी भूमिकांमुळे सतीश शहा यांची स्वतंत्र ओळख आहे. तर, बी. पी. सिंग हे ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी आहेत. ‘सीआयडी’ या गाजलेल्या मालिकेचे निर्माता-दिग्दर्शक असलेल्या सिंग यांनी ‘आहट’ या मालिकेचेही दिग्दर्शन केले आहे.