अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्रामाणिक प्रयत्न होत नसून सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप ‘आप’चे मावळ लोकसभेचे उमेदवार मारूती भापकर यांनी केला आहे. ‘मनी’ व ‘मसल पॉवर’च्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
भापकरांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्यानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मानव कांबळे, डॉ. श्याम आहिरराव, प्रदीप पवार, श्रीकांत बोरसे यावेळी उपस्थित होते. भापकर म्हणाले, सहाही विधानसभा मतदारसंघात ओळख तसेच काम असल्याने मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, तरीही आपला मत दिल्यास वाया जाईल, असा अपप्रचार सुरू आहे. कोणी आपल्याला उभे केले नाही, कोणाची मते खाण्यासाठी आपण िरगणात नाही, लढतो आहे तेजिंकण्यासाठी, आमची लढत महायुतीशी आहे. िपपरी पालिकेतील चुकीच्या गोष्टींना आपण सातत्याने विरोध केला, उधळपट्टीला, भ्रष्टाचाराला शक्य तितका चाप लावला. कामगार व शेतकऱ्यांच्या आंदोलनात तसेच जनतेशी संबंधित अनेक चळवळीत सहभाग घेतला. जनतेला आपले काम माहिती आहे आणि सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनाही जनता ओळखून आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी आपण लढा दिला, त्यात सिंहाचा वाटा आपला असताना युतीचे नेते श्रेयासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे, असे ते म्हणाले. रविवारी कामगार संघटनांची रॅली व सभा होणार आहे. दोन एप्रिलला मेधा पाटकर व १२ एप्रिलला योगेंद्र यादव प्रचारासाठी शहरात येणार आहेत. आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा आहेत, असे भापकर यांनी नमूद केले.