पुणेकरांसाठी गुड न्यूज आहे.. पाणी टंचाई होईल का? असा प्रश्न पुणेकरांना भेडसावणार नाहीये. कारण गेल्या आठवड्यापासून सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. तसंच मागील तीन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसर तसंच धरणक्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुणे शहराला १० महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणक्षेत्रात जमा झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पुण्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मात्र तो अंदाज चुकला. जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं पाणी टंचाई होते की काय? अशी टांगती तलावर पुणेकरांच्या डोक्यावर होती. मात्र ही भीती आता दूर झाली आहे. कारण मागील तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानं ही सगळी कसर भरून काढली आहे. त्यामुळे पुणे शहरावर आलेलं टंचाईचं संकट दूर झालं आहे. आता पुणेकरांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागणार नाहीये.

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला धरणात ६ मिमी पाऊस झाला आहे. धरणात  ०.९४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत धरणात २२ मिमी पाऊस झाला आहे. पानशेत धरण ६.५५ टीएमसी भरलं आहे. वरसगाव धरणात २० मिमी पाऊस झाला आहे. या धरणातील साठा ४.५० टीएमसी वर गेला आहे, तर टेमघर धरणात २९ मिमी पाऊस झाला आहे. या धरणातील पाणीसाठा ०.७५ टीएमसीवर गेला आहे.