एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही. तर कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल. असा दावा बचाव पक्षाच्या वतीने आज न्यायालयात केला. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला असून उद्या न्यायालय निर्णय देणार आहे.

विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आणि बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी काम पाहिले.

यावेळी सरकारी वकील उज्ज्वला पवार या युक्तिवाद करताना म्हणाल्या की, देशात अराजकता माजवण्यासाठी तुम्ही भीमा कोरेगाव दंगलीचा वापर करा, असा ठराव भारतीय कंमुनिस्ट पार्टीने केला होता. तसेच आनंद तेलतुंबडे हा सिपीडीआरचा सेक्रेटरी होता. चळवळीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त काही सूचना देखील आनंद तेलतुंबडे यांनी माओवाद्यांना केल्या होत्या, असा दावा सरकारी वकिलांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या ई मेल संभाषणातून ते देश विरोधी कारवाईमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. मनोज कोण आहे. त्याच्याकडून किती कुरिअर पाठवण्यात आले आहे. त्यांना पैसे कुठून मिळाले. याचा तपास करण्यासाठी आनंद तेलतुंबडे यांच्याकडे चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. सरकारी पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर बचाव पक्षाचे वकील रोहन नहार युक्तिवाद करताना म्हणाले की, एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही.तर कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल. असा दावा केला.

आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला असून उद्या न्यायालय निर्णय देणार आहे.