मुलुंड येथे बुधवारपासून (१३ जून) अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन होत असून, संमेलनाच्या तीन दिवसांच्या काळात नाटय़प्रयोगांनाच चक्क सुटी मिळाली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हेच नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष असल्याने संमेलनाचे नियोजन करताना नाटय़व्यावसायिकांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. संमेलन संपल्यानंतर शनिवारी आणि रविवारी पुन्हा नाटय़रसिकांना नाटकांचा आनंद लुटता येणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस होत असते. शनिवार आणि रविवार हे सुटीचे दोन दिवस नाटकांना गर्दी होते, असा नाटय़व्यावसायिकांचा अनुभव आहे. त्यामुळे नाटय़संमेलनाच्या काळात निर्मात्यांनी तीन दिवस नाटय़प्रयोग बंद ठेवून संमेलनामध्ये सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा असायची. अशा स्वरूपाचा कोणताही कायदा नसला तरी नाटय़ परिषदेचा अलिखित संकेत होता. मात्र, शनिवार-रविवारच्या सुटीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी संमेलनाच्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी झालेल्या नाटकांचे प्रयोग हमखास होत असत.

दोन महिन्यांपूर्वी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडून आले. नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने घवघवीत यश संपादन केले. कांबळी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे पहिलेच नाटय़संमेलन होत आहे. त्यामुळे संमेलनाचे नियोजन करताना नाटय़व्यावसायिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस हे नाटय़ संमेलन होत असून नाटय़व्यावसायिकांच्या भाषेत ‘आडवार’ असे म्हटले जाते. आडवारांना संमेलन होत असल्यामुळे शनिवार आणि रविवारी रसिकांना नाटके पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. यंदा तीन दिवसांच्या काळात पुण्यामध्ये प्रथमच एकही नाटय़प्रयोग होणार नाही. शुक्रवारी (१५ जून) संमेलनाचे सूप वाजल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे गुजराती नाटकाचा प्रयोग होणार आहे.

यासंदर्भात मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी म्हणाले,की सध्या नाटय़व्यवसाय हा केवळ शनिवार आणि रविवारपुरताच मर्यादित राहिला आहे. अन्य वारी नाटकाचा प्रयोग लावला तर रसिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही हे वास्तव आहे. दहावी-बारावीचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील प्रवेश प्रक्रिया आणि मुलांच्या शाळा सुरू होण्याचा कालावधी असल्यामुळे नाटय़रसिक आधी पालकाचे कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे नाटय़संमेलन आडवारी घेतल्याचा फायदा नाटय़व्यावसायिकांना मिळेल.

शनिवार-रविवारी नाटकांची रेलचेल

मुलुंड येथील नाटय़संमेलनाचे शुक्रवारी सूप वाजल्यानंतर शनिवारी (१६ जून) आणि रविवारी (१७ जून) व्यावसायिक रंगभूमीवर यश संपादन केलेल्या नाटकांची रेलचेल रसिकांना अनुभवता येणार आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ संस्थेच्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्याबरोबरच ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘घरात मॅरिड बाहेर बॅचलर’, ‘अनन्या’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘आमच्या हिचं प्रकरण’ अशी नाटके पाहण्याचे पर्याय पुणेकर रसिकांना उपलब्ध झाले आहेत.