धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३२५ व्या हौतात्म पुण्यस्मरणानिमित्त ‘ज्वलज्ज्वलनतेजस श्री शंभू छत्रपती मोहीम’ आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम दुचाकी गाडय़ांवरील असून श्री क्षेत्र संगमेश्वर ते पावनक्षेत्र तुळापूर असा प्रवास मोहिमेत सहभागी झालेले युवक करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात रविवार (२३ मार्च) सकाळी १० वाजता पुण्यातील लाल महाल येथून होणार असून मोहिमेची सांगता ३० मार्च रोजी तुळापूर येथे होणार आहे.या मोहिमेत सात जिल्हे आणि ३१ तालुक्यात शंभूजागर केला जाणार आहे. मोहिमेच्या प्रवासाचे अंतर एक हजार ४४४ किलोमीटर आहे. मोहिमेचा प्रारंभ पुण्यातील लाल महाल येथून होणार असून पुरंदर, यवत, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, दिघंची आटपाडी, श्री भूपाळगड, विटा, तासगाव, सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, पन्हाळा, अणुस्कुरा, रत्नागिरी, जयगड, संगमेश्वर, देवरुख, साखरपा, मलकापूर, बत्तीस शिराळा, येणपे, कराड, मसूर, रघुनाथपूर, कोरेगाव, वर्धनगड, पुसेगाव, राजापूर, संतोषगड, फलटण, बारामती, दौंड, पेडगाव, श्रीगोंदा, काष्टी, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा या मार्गे येऊन तुळापूर येथे या मोहिमेची सांगता होणार असल्याची माहिती महादेव महिंद यांनी दिली. मोहिमेत सहभागी झालेले युवक सात गिरीदुर्गाना तसेच दोन सागरीदुर्गाना आणि पाच भुईकोट किल्ल्यांना भेट देणार आहेत.इतिहासाचे पुनर्जागरण, गडकोटांचा अभ्यास, देशावर प्रेम करणाऱ्यांशी मैत्री, साहसाचा अनुभव ही मोहिमेची वैशिष्टय़ असून देशभक्तीचा संदेश या मोहिमेतून गावागावात दिला जाईल, असेही सांगण्यात आले.