‘झालं-गेलं’ विसरून शहरविकासाचा दावा गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील पक्के हाडवैरी म्हणून ओळखले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप व माजी महापौर आझम पानसरे यांनी ‘झालं-गेलं’ विसरून जात ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’चे गीत आळवण्यास सुरूवात केली आहे. पिंपरीत आतापर्यंत पवारांची ‘दादागिरी’ होती. मात्र, लक्ष्मण ‘भाऊ’ जगताप, महेश ‘दादा’ लांडगे यांच्याबरोबरच आता आझम ‘भाई’ पानसरे भाजपमध्ये दाखल झाल्याने कारभारी अजित ‘दादा’ पवारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पिंपरीच्या राजकारणात पानसरे-जगताप यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत असून अनेक वर्षांपासून त्यांच्यात तणावपूर्ण संघर्ष आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वादाची तीव्रता शहरवासीयांनी अनुभवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पानसरे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याची भाजपमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. पानसरे यांचा भाजप प्रवेश ‘वाजवून’ घेण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा जगताप-पानसरे यांनी कटुता विसरून शहरविकासासाठी एकत्र येण्याची ग्वाही दिली, त्याचे अनेकांना अप्रूप वाटले. जगताप म्हणाले, वयाच्या ५० व्या वर्षांपर्यंत मनुष्य चुका करत राहतो. आमच्या गतकाळात अनेक चुका झाल्या असतील. मात्र, एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचा प्रयत्न यापुढे आम्ही करणार आहोत. पानसरे पक्षात आल्याने आमची ताकद वाढल्याचे सांगत जगतापांनी, भविष्यात पानसरे आमच्यासोबत मुंबईत असतील, अशी सूचक ग्वाही दिली. तर, १९८६ पासून आम्ही एकत्र काम केल्याचे सांगत पानसरे यांनीही भविष्यात आमच्यात कधीही मतभेद होणार नाहीत, अशी खात्री दिली. जगताप-पानसरे यांचे मैत्रीचे गोडवे सुरू असतानाच, पानसरे हे माझे राजकीय गुरू आहेत, असे सांगत लांडगे यांनीही ऋण व्यक्त केले. युतीला तत्त्वत: मान्यता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याने चिंचवडला पार पडलेल्या भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत युती करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. भाजपकडून खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष राहुल कलाटे उपस्थित होते. युतीची गरज व्यक्त करत बैठकीत वादविरहित मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा झाली. पुढील बैठकीत अन्य मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करण्याचे ठरवण्यात आले.