अवघ्या दहा महिन्यांचा मुलगा आणि सहा वर्षाच्या मुली समोरच त्यांच्या जन्मदात्या आईने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ राजेश कुमार दास यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रश्मीता राजेंद्र दास (वय २६) असे या महिलेचे नाव आहे. ऐन दिवाळीत पतीच्या जाचाला कंटाळून रश्मीता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आपल्या चिमुकलल्यांसमोरच फास आवळत रश्मीता यांनी हे जग सोडले. आत्महत्येपूर्वी आपल्या सहा वर्षीय मुलीला तू लहान बाळाचा सांभाळ करं असं सांगत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी पती राजेंद्र चंद्रमनी दास (वय ३७) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मीता यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून यामध्ये पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे दोन्ही मुलांना आई कळण्याच्या अगोदरच ती सोडून गेल्याचं दुःख वाटत असल्याचे सांगत परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.