निराकार लेखन करीत असताना कवितेने मला नादवून टाकले. कविता हा माझ्यासाठी महत्त्वाकांक्षेचा विषय झाला नाही. चांगलं माणूस होणं हाच माझ्या लेखनाचा ध्यास राहिला, अशी भावना प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांनी मंगळवारी व्यक्त केली.ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मृण्मयी परिवारातर्फे ज्येष्ठ लेखक-संपादक आनंद अंतरकर यांच्या हस्ते आसावरी काकडे यांना ‘मृण्मयी पुरस्कार’ आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. सुजाता राजापूरकर यांना ‘नीरा-गोपाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गोनीदांची कन्या डॉ. वीणा देव आणि डॉ. विजय देव या वेळी व्यासपीठावर होते.वसुधा मेहेंदळे यांच्यासमवेत साहित्य संमेलनासाठी तळेगाव येथे गेले असताना गोनीदांच्या घरी केलेले वास्तव्य, ही आठवण सांगून आसावरी काकडे म्हणाल्या,‘‘अप्पांच्या आशीर्वादाने सुरू झालेला लेखनप्रवास हा प्रसिद्ध होईल या आशेपेक्षाही लेखन करण्यामध्येच आनंद मानत होते. नवी अस्वस्थता आणि त्यातून होत गेलेल्या लेखनाच्या माध्यमातून स्वसमुपदेशनही होत राहिले. मनात उमगणारे नवे आकलन जणू नवा जन्म व्हावा असा आनंद देणारे होते. लिहिताना काही उमगणे आणि ते शब्दामध्ये उमटणे ही लेखनाची प्रक्रिया माझ्यासाठी सार्थकतेचा सोहळा ठरली.’’ साहित्य हे चिंतनप्रवण, तर सामाजिक कार्य कृतिप्रवण असते, असे सांगून आनंद अंतरकर म्हणाले,की कवीचे मन ही सायलेंट व्हॅली असते. तीव्र संवेदनेचा दंश झाल्याखेरीज कविता जन्माला येत नाही. आजवरच्या लेखनातून स्त्रीप्रश्नांचा ऊहापोह झाला. आता स्त्रीप्रश्नांची धीटपणाने उत्तरे मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.सुजाता राजापूरकर यांनी किडनी विकाराच्या रुग्णांसाठी करीत असलेल्या कामाची माहिती दिली. वीणा देव यांनी काकडे यांचा, तर विजय देव यांनी राजापूरकर यांचा परिचय करून दिला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.