विविध ठिकाणी कार्यक्रमांसाठी जाताना शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात कचरा साठून राहात असल्याचे दिसत असून नागरिकांच्याही त्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे अतित्वर्य विशेष मोहीम राबवून स्वच्छतेचे नियोजन करावे आणि या कामाचा दैनंदिन तपशील माझ्या कार्यालयात पाठवावा, असे पत्र महापौर चंचला कोद्रे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला दिले.शहरातील स्वच्छतेच्या तक्रारींबाबत महापौरांनी पुढाकार घेतला असून शहरात सर्वत्र कचरा साठत असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या बाबत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. महापौर या नात्याने शहरात विविध कार्यक्रमांना जातानाही सर्वत्र कचरा साठल्याचे दिसत आहे, असे महापौरांनी या पत्रात नमूद केले आहे.अस्वच्छ परिस्थिती सुधारण्याबाबत तातडीने नियोजन करून कार्यवाही करावी. तसेच, शहरात टाकला जाणारा कचरा रोजच्या रोज उचलला जात असला, तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा साठण्याचे प्रमाण व तो उचलला जाण्याचे प्रमाण व्यस्त आहे. त्याबाबत कार्यवाही करावी आणि नियोजन व कार्यवाहीचा दैनंदिन तपशील कार्यालयात पाठवावा, असा लेखी आदेश महापौरांनी दिला आहे.