इंटर्नशीपमधून दोन क्रेडिट पॉईंट्स; यूजीसीकडून विद्यापीठांना निर्देश (चिन्मय पाटणकर ) पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत ही योजना देशभरात ठप्प झालेली असताना या योजनेला तगवण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २ क्रेडिट पॉईंट्सचे आमिष दाखवण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र पाठवून स्वच्छ भारत समर इंटर्नशीप या योजनेची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठांनी ही योजना राबवल्यास देशभरातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानात पंधरा दिवसांची इंटर्नशीप करून २ क्रेडिट पॉईंट्स मिळू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी देशभरात स्वच्छ भारत हे अभियान सुरू केले. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटायझेशन यांच्या सहकार्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्वच्छ भारत समर इंटर्नशीप ही योजना सादर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने समर इंटर्नशीपसाठी ही योजना मान्य केली आहे. या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या समर इंटर्नशीपमध्ये १५ दिवस (१०० तास) स्वच्छ भारत योजनेचे काम करावे लागणार आहे. या बाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांना २३ मार्च रोजी पत्र पाठवून ही योजना राबवण्याबाबत कळवले होते. तसेच उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनीही २० एप्रिलला सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवून या योजनेमध्ये सक्रिय सहभागाबाबत आवाहन केले होते. या पत्रामध्ये मार्गदर्शक तत्त्वे आणि इंटर्नशीप करताना विद्यार्थ्यांनी काय करावे हेही स्पष्ट करण्यात आले होते. आता पुन्हा ८ मे रोजी यूजीसीने पत्र पाठवून योजना राबवण्याची सूचना केली आहे. ‘स्वच्छ भारत योजना ही देशाच्या हितासाठी महत्त्वाची आहे. विशेषत ग्रामीण भागामध्ये या योजनेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी समर इंटर्नशीप उपयुक्त ठरणार आहेत. आपल्या विद्यापीठाकडून यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या विद्यापीठाचे जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी झाल्यास ही योजना यशस्वी ठरेल,’ असे यूजीसीचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र पाल सिंग यांनी विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. गुणानुक्रमासाठी मोलाचे पॉईंट्स दोन क्रे डिट पॉईंट्स विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार मोलाचे आहेत. या क्रेडिट पॉईंट्समुळे विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम बदलू शकतो. आता आयोगाने पुन्हा एकदा विद्यापीठांना या बाबत पत्र पाठवून स्वच्छ भारत समर इंटर्नशीप योजनेची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे.