यंदाही गुणवत्ता यादी नाही पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल ऑफ सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या (सीआयएससीई) दहावी (आयसीएसई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांचा निकाल शनिवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात देशपातळीवर दहावीचा निकाल ९९.९८ टक्के , तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के लागला असून यंदाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीआयएससीईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. दहावीसाठी यंदा २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात १ लाख १८ हजार ८४६ मुले, १ लाख ६५३ मुली होत्या. दहावीचा एकू ण ९९.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुले आणि मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण समान म्हणजे ९९.९८ टक्के आहे. तर बारावीसाठी ९४ हजार ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ५० हजार ४५९ मुले, ४३ हजार ५५२ मुली होत्या. बारावीचा एकूण निकाल ९९.७६ टक्के लागला. त्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के , तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६६ टक्के आहे. बारावीचे २३० आणि दहावीचे ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. विभागनिहाय निकालामध्ये दहावीच्या उत्तर विभागाचा निकाल ९९.९७ टक्के , पूर्व विभागाचा निकाल ९९.९८ टक्के , पश्चिम विभागाचा निकाल ९९.९९ टक्के , दक्षिण आणि परदेश विभागाचा निकाल १०० टक्के लागला. बारावीच्या उत्तर विभागाचा निकाल ९९.७५ टक्के , पूर्व विभागाचा निकाल ९९.७० टक्के , पश्चिम आणि दक्षिण विभागाचा निकाल ९९.९१ टक्के , परदेश विभागाचा निकाला १०० टक्के लागला. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९९.३३ टक्के आणि बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही निकालांमध्ये वाढ झाली आहे. आक्षेप असल्यास शाळेकडे अर्ज आवश्यक यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. या वर्षी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची सुविधा देण्यात आलेली नाही. गुणांबाबत आक्षेप असल्यास संबंधित विद्याथ्र्याला शाळेला लेखी अर्ज द्यावा लागेल. विद्याथ्र्याचा अर्ज शाळेकडून आवश्यक कागदपत्रांसह सीआयएससीईला पाठवला जाईल. त्यानंतर मंडळाकडून पुनर्तपासणी करून गुणात बदल असल्यास किंवा नसल्यास शाळेला त्याबाबत कळवले जाईल, असे मंडळाचे मुख्याधिकारी आणि सचिव गॅरी अॅराथून यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. राज्याचा दहावीचा निकाल १०० टक्के , बारावीचा निकाल ९९.९४ टक्के राज्यातून दहावीचे २४ हजार ३५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर बारावीचे ३ हजार ४२७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात दहावीचा निकाल १०० टक्के लागला, तर बारावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला. दहावी आणि बारावीचे मिळून केवळ तीन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची माहिती सीआयएससीईने दिली.