प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं..असं मंगेश पाडगावकर यांनी कवितेच्या माध्यमातून म्हटलंय, पण खरच तुमचं आमचं सेम असतं का हा प्रश्न आहे. कारण पिंपरी-चिंचवडमध्ये एक अंध प्रेमी जोडप गेल्या पंधरा वर्षांपासून सुखी संसार करत आहे. खरंतर त्यांच हे प्रेम डोळस व्यक्तींना देखील लाजवणार असून त्यांना डोळसपणे प्रेम करायला भाग पडणारे आहे. सविता घाणेकर आणि दिलीप घाणेकर असे या अंध प्रेमी युगलाचे नाव असून त्यांची प्रेम कहाणी नक्कीच प्रेरणा देणारी आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं अस म्हटलं जातं, मात्र आजच्या युगात बँक बॅलन्स,रंग,रूप पाहून प्रेम करण्याची प्रथाच पडली आहे. त्यामुळे प्रेमात काही युद्ध करण्याची गरज पडत नाही. परंतु सविता आणि दिलीप घाणेकर या दाम्पत्याने निस्वार्थपणे प्रेमाचे धडे गिरवले असून सात जन्म सोबत राहणार असल्याचे त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांच्या प्रेमाला तब्बल पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. प्रेमरूपी वेलीवर सतत सुख बहरत आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सविता या चिंचवडच्या मोहन नगर येथील दिव्यांगाच्या संस्थेत होत्या. त्यावेळी दिलीप हे त्यांच्या प्रेमात पडले, खरंतर दोघांनाही दिसत नाही. गप्पा गोष्टी चालायच्या तेव्हा दिलीप यांना त्यांचे अंध मित्र सविता यांच्या नावाने चिडवायचे. एकेदिवशी त्यांनी थेट जाऊन सविता यांना आपल्या मनातील भावना सांगत तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणून प्रपोज केले. त्यांनीही काही कळायच्या आत तुम्ही मला देखील आवडता असं उत्तर दिलं, दोघांना दिसत नसल्याने त्यांच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ दिसत नव्हता. त्यांचं प्रेमप्रकरण तब्बल पाच ते सहा महिने चाललं. दिलीप हे सविता यांना सोडण्यासाठी रेल्वेने तळेगावपर्यंत जात असत. संस्थेच्या पाठीमागील बाजूस एक पेरुचे झाड होते तिथे सविता आणि दिलीप गप्पा मारायचे. अखेर त्यांचा विवाह २००३ मध्ये झाला,काही वर्षांनी त्यांना गोंडस मुलगा झाला त्याचं नाव जय आहे. लग्न झाल्यानंतर अनेक अडचणींना ते सामोरे गेले. दिलीप हे पिंपरी-चिंचवड शहरातील एका खासगी कंपनीत कागदी पाकिटात पेन्सिल भरण्याच काम करतात तर सविता या राखी बनवण्याचं काम करून संसार चालवतात. मोकळ्या वेळेत सविता अगरबत्ती विकून पैशांची तडजोड करतात. मिळालेल्या काही पैशातून संसार चालवला जातो. दोघांमध्ये जिद्द असून ते आयुष्याशी दोन हात करत आहेत. लग्नाअगोदर सविता यांचा रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाला होता, त्यात जखमी झाल्या. त्यांच्या पाठीशी गंभीर पणे उभे रहात दिलीप यांनी सविता यांना साथ दिली होती. तेव्हा पासून आजपर्यंत ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत त्यांनी उत्तमरित्या सर्व काही सांभाळल आहे. प्रेम हे आंधळ असलं तरी ते डोळसपणे करता आलं पाहिजे हेच या अंध दाम्पत्याने सुखी संसारातून दाखवून दिले आहे. प्रेमात अंतरंग बघितला जातो त्यामुळे दृष्टी हवीच असं नसतं.