‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाते. पण, ही उक्ती युवकांनी आपल्या कृतीतून जागतिक पातळीवर सिद्ध करण्याची वेळ आली आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी शनिवारी व्यक्त केली.
युवा सेनेतर्फे आयोजित युवा एकांकिका कार्यक्रमात मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते लेखक-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, गिरीश दातार, अभिनेता अमेय वाघ, सरोदवादक सारंग कुलकर्णी, गायक जयदीप वैद्य, भरतनाटय़म नृत्यांगना अंबरी रेगे, रंगभूषा-वेशभूषाकार भुविनी शहा, अभिनेत्री पर्ण पेठे, प्रकाशयोजनाकार सुजय भडकमकर, सहायक अभिनेता अक्षय टंकसाळे या दहा कलाकारांना ‘युवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिवसेना प्रवक्तया आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महादेव बाबर, महापालिका गटनेते अशोक हरणावळ, अजय भोसले, प्रशांत बधे, उमेश चांदगुडे, विलास सोनवणे, किरण साळी या प्रसंगी उपस्थित होते.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या,‘‘अभिनयामध्ये कारकीर्द घडवल्यानंतर दिग्दर्शनाच्या माध्यमातून कॅमेऱ्यामागे काय घडते याचा अनुभव ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाच्या माध्यमातून घेतला. कलाकार हा नेहमीच प्रकाशझोतामध्ये असतो. पण, पडद्यामागची मंडळी ही त्यांची कला प्रेक्षकांसमोर आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये लग्न आणि प्रेम या घटना महत्त्वाच्या आहेत. त्यांची सांगड घालताना प्रत्येकाची दमछाक होते, हेच मी या चित्रपटातून अधोरेखित केले आहे.