शहरातून अठरा वर्षांखालील मुले-मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात प्रत्येक वर्षी वाढच होत चालली आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यातून अठरा वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींपैकी बावीस टक्के अद्यापही बेपत्ताच आहेत. एकूण व्यक्ती हरवण्याच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे पुणे पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून पुणे शहराची ओळख आहे. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहराची वाढ वेगाने होत आहे. शहरातून हरवलेल्या व्यक्तींची संख्या वाढत चालली आहे. २००८ ते मार्च २०१३ पर्यंत पुणे शहरातून १७ हजार तीनशे ३३ व्यक्ती हरवल्या असून त्यापैकी ११ हजार ३५४ व्यक्ती सापडल्या आहेत. अद्यापही सहा हजार व्यक्ती बेपत्ता आहेत. देशात हरवलेल्या मुला-मुलींची संख्या वाढत असल्यामुळे एका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने १४ वर्षांखाली हरवलेल्या मुला-मुलींसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
पुणे शहरातून २००८ ते मार्च २०१३ पर्यंत अठरा वर्षांखालील सहा हजार तीनशे साठ मुले-मुली हरवल्याची पोलिसांकडे नोंद आहे. त्यापैकी सापडलेल्या मुला-मुलींची संख्या ही पाच हजार आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातून तीन हजार ६१९ मुली हरवल्याची नोंद असून त्यापैकी अद्यापही ७४० मुली बेपत्ता आहेत. तर २ हजार ७८१ मुले हरवली असून त्यापैकी ६५९ मुले बेपत्ता आहेत. मुलांपेक्षा हरवण्याच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. हरवलेल्या व्यक्तींची नोंद पोलीस ठाण्यात होते. मात्र, ती व्यक्ती सापडल्यानंतर पोलिसांना सांगितले जात नसल्याचे आढळून आले आहे.
याबाबत मिसींग सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, चौदा वर्षांखाली हरवलेल्या मुलांसंदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे परिपत्र नुकतेच काढण्यात आले आहे. हरवलेल्या व्यक्तीच्या घरी पोलिसांनी पंधरा दिवसांनी जाऊन व्यक्तीबाबत चौकशी करणे अपेक्षित आहे. या व्यक्ती शोधण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.