पुणे : शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीमधील आठ सदस्यांची भूमिका काय आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू पाडून तेथे सुसज्ज नाटय़संकुल उभारण्याचे नियोजित आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला आपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात आपचे राज्य प्रवक्ता डॉ. अभिजित मोरे आणि राज्य संघटक, पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना याबाबत चर्चा करून नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि कलाकारांचे मत विचारात घेऊन याबाबत निर्णय घेता आला असता. प्रशासकांच्या हाती कारभार गेल्यानंतर हा निर्णय गुपचूपपणे रेटला जात आहे. या प्रक्रियेमध्ये पुरेशी पारदर्शकता नाही. पुनर्विकासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये महापालिका पदाधिकारी-अधिकाऱ्यांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, कोथरूड नाटय़ परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाटय़कर्मी श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व परिवाराच्या अनुराधा राजहंस, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निवेदक सुधीर गाडगीळ, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव यांचा समावेश होता. यातील सुनील महाजन यांनी बालगंधर्व पाडण्यास विरोध दर्शविला आहे. अन्य आठ सदस्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जाहीरपणे मांडावी, असे मोरे आणि कुंभार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सन २०१८ साली १० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या प्रकल्पाची रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत कशी काय वाढली? याबाबत संबंधित कलाकारांना कल्पना दिली गेली होती का? सध्याची १४ नाटय़गृहे नीट चालवण्याबाबत तरतूद करण्याऐवजी एकाच प्रकल्पावर १०० कोटी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.