पौष, माघ, फाल्गुन हे महिने झाडांचा पर्णहीन होण्याचा काळ. ठिकठिकाणची काटेसावरीची झाडे सारा पर्णसाज उतरवून बसली आहेत. जंगली बदाम, शिरीष हळूहळू पाने गाळीत आहेत. माझ्या घरासमोरचा महागुनीचा वृक्ष प्रतिवर्षी २६ फेब्रुवारीस पाने गाळायला सुरुवात करतो. वाऱ्यावर लहरत दोन दिवसांत पूर्ण पर्णसंभार खाली उतरतो अन् जमिनीवर पिवळट पानांचा मऊ मुलायम गालिचा पसरतो. मंद झुळकेसरशी भिरभिरत खाली पडणारी पोक्त पानं पाहिली की मन विरक्त होतं. या पानांचं कौतुकही वाटतं. आयुष्यभर झाडासाठी अन्न बनवायचं, खोड, मुळं, फुलं, फळं सगळय़ांचं पोषण करायचं, अन्न साठवायचं, चयापचयासाठी मदत करायची अन् ऋतुचक्र सांभाळत अलगद विलग व्हायचं. जे जवळ होतं तेही मातृवक्षालाच अर्पण करायचं. पौष, माघ, फाल्गुनातलं हे सौंदर्य बाहेरून रूक्ष, पण अंतरी ओलावा जपणारं. झाडांची अंत:प्रेरणा वाखाणण्यासारखीच. मातीतून, अचेतनातून ऊर्जा घेऊन सचेतन रूपाने प्रगटणे ही वनस्पतींची किमया. जमिनीतील अदम्य जीवनस्रोत प्राशन करून झाडांना कोवळे कोंब फुटतात. लवलवणारी पोपटी, तांब्रवर्णी पालवी पाहून मन प्रसन्न होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रा. एस. ए. दाभोळकर, डॉ. के. आर. दाते, डॉ. रमेश दोशी यांसारख्या प्रयोगशील शास्त्रज्ञांनी झाडाच्या विविध भागांचा अभ्यास केला अन् जाणले की वनस्पती हे अजब कारखाने आहेत. मातीतून मुळांद्वारे लोह, मँगेनीज, कॅल्शियम, जस्त, बोरॉन, सिलिका, सल्फर असे घटक शोषून वेगवेगळय़ा ठिकाणी साठवले जातात. पानांमध्ये मोठय़ा प्रमाणात रासायनिक द्रव्ये साठवलेली असतात हे आपण जाणून घेतले तर आपण आपली बाग अधिक संपन्न करू शकू. प्रत्येक झाडाचे गुणधर्म व त्यातील रासायनिक उपलब्धता वेगवेगळी असते. तसेच प्रत्येकाला वाढीसाठी लागणारे मुख्य घटक व सूक्ष्म घटक (ट्रेस एलिमेंट्स) यांची गरज वेगवेगळी असते. जसे, आपल्याही आहारात भात, पोळी, भाजी, आमटी जास्त, तर मीठ, िलबू, चटणी यांचे प्रमाण माफक असते. तसेच झाडांचेही असते.

कोवळय़ा पानांमध्ये आम्ले जास्त असतात. बऱ्याच वेळेला ताम्रवर्ण हा आम्लामुळेच येतो. तसेच या पानात ग्लुकोजही जास्त आढळते. पिकल्या पानामध्ये त्यामानाने ग्लुकोज कमी आढळते. पानाच्या वेगवेगळय़ा अवस्थेत वेगवेगळी रासायनिक द्रव्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतात.

कोवळे शेंडे-जस्त, फॉस्फेट

हिरवीगार पाने- नत्र, पोटॅश, मॅग्नेशियम

सुकी पाने- कॅल्शियम, सिलिका, बोरॉन, लोह, मँगेनीज

आंब्याची पाने व आंबे यातील रासायनिक घटक पाहाल तर अचंबित व्हाल.

म्हणजे फळनिर्मितीसाठी पानातील फार थोडे रासायनिक घटक वापरले जातात. फळात जास्त ग्लुकोज (शर्करा) व पाणीच असते. म्हणून फळे मधुर व रसाळ असतात. हुरडय़ाबरोबर आपण उसाचा रस पितो. या उसात काय काय दडलंय पाहा.

उसाच्या रसात शर्करा व पाणी पिळले जाते. पण पाचटात पुष्कळ पोषकद्रव्ये राहतात. याचा उपयोग बागेसाठी करायला हवा. थोडक्यात आंबे आपण खायचे, उसाचा रस प्यायचा अन् पाने व पाचट झाडास खायला घालायचे.

पानातले घटक गळण्याआधी झाडाला परत केले जातात. तरी पुष्कळ पोषक घटक तसेच राहतात, त्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. ही पोषक द्रव्ये त्यांच्या पोषणासाठीच वापरायला हवीत. पण आपण ही धातूंची खाण असलेली पाने जेव्हा खाली गळतात तेव्हा आवार स्वच्छ करताना पाने झाडून पोत्यात कोंबून कचऱ्यात फेकून देतो. अहो, तो पानांचा कचरा कोणी घेऊन जात नाही. त्याचे काय करायचे म्हणून त्रागा करतो. काही जण त्यास काडी लावतात. त्यामुळे पानातील सूर्यऊर्जा विखरून जाते, धूर होतो अन् प्रदूषणास हातभार लागतो.

परसबाग करणे म्हणजे निसर्ग जवळ करणे, निसर्ग जाणून घेणे. त्यामुळे पानगळतीकडे बघण्याची दृष्टी बदला, यातूनच आपल्या झाडांसाठी अन्नघटक कसे पुरवता येतील याचे प्रयोग करा.

वर्षांनुवष्रे पालापाचोळा पडून समृद्ध झालेली जमीन व त्यावरील अफाट जैवविविधता ही निसर्गातील स्वयंपूर्णता जाणून घेतली तर आपल्याला कळेल ही पानगळ ही पर्वणी आहे!

१०० ग्रॅम आंब्याची पाने

१०० ग्रॅम आंबा

N- १.८८ ग्रॅम

N- ०.१२ ग्रॅम

P -१५० मिली ग्रॅम

P – ६ मिली ग्रॅम

K  –  १.५ एमजी

K  – २१० एमजी

Mg  – ३२० मिली ग्रॅम

Mg  – ५० मिली ग्रॅम

Ca – २.४४ मिली ग्रॅम

Ca – ९० मिली ग्रॅम

 

१ किलो ऊस

N– १.७ ग्रॅम,   P- ८०० एमजी,

K- २ ग्रॅम,   Mg- ७२० एमजी,

Fe- ११० एमजी,   Mn– ४० एमजी,

Ca- ८०० एमजी,     S– ३०० एमजी,

Zn- ४ एमजी,     Cu–८ एमजी.

पूर्वार्ध

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about plants information
First published on: 25-01-2017 at 02:57 IST