‘लहानपणापासून मला सौंदर्य स्पर्धाचं खूप आकर्षण होतं. महाविद्यालयात शिकताना काही लहान सौंदर्य स्पर्धाचा अनुभवही मी घेतला होता. इतर मुलामुलींसारखं मीसुद्धा इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं असं घरच्यांना वाटत होतं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन लग्नानंतर मी नवऱ्याच्या व्यवसायात कामही करू लागले, पण तरीही सौंदर्य स्पर्धाचे ते विचार मनातच राहिलेच. आता माझा एक मुलगा १३ वर्षांचा आणि दुसरा ११ वर्षांचा आहे. आता मी स्वत:ला वेळ देऊ शकते..,’ अश्विनी जाधव-लाला सांगत होत्या. मूळच्या पुण्याच्या असलेल्या आणि लग्नानंतर कोलकात्यात राहणाऱ्या अश्विनी ‘मिसेस एशिया इंटरनॅशनल पीजंट’ या सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धक आहेत. या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी पुण्यात होणार आहे. लग्न झालेल्या, अगदी आई आणि आजीही असलेल्या २४ महिला या अंतिम फेरीत आपल्या सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता आणि कलागुणांचीही चुणूक दाखवणार आहेत. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या महिलेला जूनमध्ये मलेशियात होणाऱ्या ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड फिनाले’ या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्पर्धेच्या संचालक दीपाली फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. नितीन ढेपे आणि अमनोरा टाऊन सेंटरचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मोनीश भोजवानी या वेळी उपस्थित होते.या स्पर्धेत उतरलेल्या महिला वयाची चाळिशी आणि अगदी पन्नाशीही पार केलेल्या आहेत. पण ‘रॅम्प’वर चालण्याचे त्यांना असलेले आकर्षण आणि त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. अश्विनी म्हणाल्या, ‘‘माझ्या आजेसासू, सासू, आम्ही आणि मुले असे आमचे चार पिढय़ांचे एकत्र कुटुंब आहे. विशेष म्हणजे आजेसासूबाईंपासून कुटुंबातील सगळ्यांचा मी सौंदर्य स्पर्धेत उतरण्याला पूर्ण पाठिंबा आहे.’’नागपूरच्या ५५ वर्षांच्या स्पर्धक वंदना देशपांडे यांचा सौंदर्य स्पर्धेत उतरण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्या म्हणाल्या, ‘‘मी ब्यूटी पार्लर चालवते. वजन कमी करण्याबाबत सल्लागार म्हणूनही काम करते. माझी दोन्ही मुले मोठी आहेत. मला सूनही आहे. सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची पूर्वीपासूनची इच्छा पूर्ण करून घ्यायला आता मी वेळ देऊ शकते. म्हणूनच स्पर्धेची जाहिरात पाहिल्यावर लगेच सहभागी व्हायचे ठरवले. स्वत:चे व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासाने कसे प्रकट करावे, मेक-अप कसा करावा, स्पर्धेसाठी स्वत:चा ‘फिटनेस’ कार्यक्रम कसा आखावा या सर्व गोष्टींवर मी स्वत:च काम केले. सासू-सासरे आणि घरचे इतर जणही स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून येणार आहेत.’’कर्णबधिर मुलांना शिकवण्याचे काम करणाऱ्या राधा पवार रत्नागिरीच्या आहेत. ‘मिसेस रत्नागिरी’ आणि ‘मिसेस कोकण’ स्पर्धेत त्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे. राधा म्हणाल्या, ‘‘स्वत:ची आवड आणि छंद जपण्यासाठी, कलागुण प्रकट करण्यासाठी सौंदर्य स्पर्धा हे चांगले व्यासपीठ आहे. माझा मुलगा आता २३ वर्षांचा आहे. माझ्याही घरच्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. पारंपरिक कपडय़ांच्या फेरीत तुला नऊवारी साडी नेसवायला मी येऊ का, असे विचारणाऱ्या माझ्या सासूबाईंनाही माझ्या सादरीकरणाबद्दल खूप उत्कंठा आहे.’’