शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही तुरुंगात जातील, असं सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या, असं विधान किरीट सोमय्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, “गेल्यावेळी गणरायाचं दर्शन घेताना मी तुरुंगात जात होतो, आज संपूर्ण महाराष्ट्र तुरुंगातून बाहेर आला आहे, म्हणून गणपतीला धन्यवाद दिला. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना केली.”

हेही वाचा- “सुजित पाटकर पळून जाणार” कोविड केंद्रातील घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचं मोठं विधान

यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. टीका करताना सोमय्या म्हणाले की, “ज्यादिवशी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं, त्यादिवशी महाराष्ट्रावरील अमंगल संपलं. आता स्वयं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मंगलमय दिवस आणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या माफीया सरकारला महाराष्ट्रातील जनतेनं कायमचं रवाना केलं आहे.”

हेही वाचा- आधी एकनाथ शिंदे ‘शिवतीर्थ’वर, आता राज ठाकरे ‘वर्षा’वर, चर्चांना उधाण

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे, तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही तुमच्या पोराची काळजी घ्या. आज दुपारी महापालिकेनं आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या मढ येथील १००० कोटींच्या स्टुडीओ घोटाळ्याची चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयाने बेकायदेशीरपणे १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी स्वत: च्या मंगलाची काळजी करावी, असा थेट इशारा सोमय्या यांनी दिला आहे.