ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मंत्री म्हणून राज्यासाठी आणि निष्ठावंत म्हणून पक्षासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी पक्षसंघटनेत लक्ष घातले, तर जिल्ह्य़ात काँग्रेस पक्ष बळकट होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळय़ात चव्हाण यांच्या हस्ते थोपटे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि आमदार संग्राम थोपटे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.  
चव्हाण म्हणाले, की काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शरद पवार यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली. त्या वेळी जिल्ह्य़ामध्ये निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करून थोपटे यांनी सोनिया गांधी यांची भोरमध्ये सभा घेतली होती. थोपटे हे पक्षाचे निर्विवाद नेते आहेत. निवडणुकीत १९९९ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले नसते, तर कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते. मात्र, त्यांचा वचक आणि दरारा कायम असल्याने भोरमध्ये दुसऱ्या पक्षाचा आमदार होऊ शकला नाही. या अनुभवी नेत्याने लक्ष घातले, तर जिल्ह्य़ात पक्ष बळकट होईल.
 तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काम पक्षाने तपासून पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त करून हर्षवर्धन पाटील म्हणाले, की त्यासाठी थोपटेंसारख्या नेत्याची आज पक्षाला गरज आहे. पतंगराव कदम म्हणाले, की राज्यात आम आदमी पक्षाची अडचण नसली, तरी आम्ही गाफील राहणार नाही. राज्यात दुधाचा महापूर निर्माण करण्याचे श्रेय थोपटेंना द्यावे लागेल असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना थोपटे म्हणाले, की मी सातत्याने लढत, संघर्ष करत आलो आहे. त्यामुळे संघर्षांशिवाय आयुष्य सपक वाटते. बारामती सारख्या कडवट राजकीय क्षेत्रात काम करताना पाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळे ताकद मिळाली. आमचे वैयक्तिक कोणाशी भांडण नाही. मी शेवटपर्यंत काँगेसबरोबरच राहणार आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘संघर्ष मावळ्याचा’ या थोपटे यांच्या आत्मचरित्राचे तसेच दिनदíशकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. थोपटे यांना मानपत्रही प्रदान करण्यात आले. होमहवन तसेच पंचतुला करण्यात आली. सुरेश वाडकर यांच्या गायनाचाही कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.