पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले.
गुंतवणुकीच्या आमिषाने ३५ हजार ठेवीदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण गुंतवणूक कायदा (एमपीआयडी)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील आर्थिक गैरव्यहार प्रतिबंधक विशेष न्यायालयात डीएसके खटल्याची सुनावणी वर्ग करण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयातीाल विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिले आहेत.




या खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात करण्यात यावी, अशी विनंती इडीकडून शिवाजीनगर न्यायालयाकडे करण्यात आली होती. याबाबत विशेष न्यायालयात पत्र देण्यात आले होते. त्यानुसार डीएसके खटल्याची सुनावणी आता मुंबईतील विशेष न्यायालयात होणार असून पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असे या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर चार वर्षांनी खटला मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करणे चुकीचे आहे. गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण कायद्यावन्ये या खटल्याची सुनावणी पुण्यातील न्यायालयात सुरू होती. या खटल्यात ठेवीदारांना विशेष महत्त्व आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात एकच न्यायाधीश ठेवीदार हितसंरक्षण कायदा तसेच सक्त वसुली संचालनालयाकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यांचे कामकाज चालविणार आहेत, असे डीएसकेंचे वकील अॅड. आशीष पाटणकर आणि अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांनी सांगितले.