‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेंतर्गत आज सकाळी सात वाजता ल्होत्से शिखरावर भारतीय तिरंगा फडकला. ‘गिरिप्रेमी’च्या आशिष माने याने जगातील चार क्रमांकाचे हे सर्वोच्च शिखर सर केले आणि गिर्यारोहण क्षेत्रात एक नवा अध्याय रचला गेला. या शिखरावर पोहोचलेला तो चौथा भारतीय आणि पहिला महाराष्ट्रीयन गिर्यारोहक आहे.
दुसरीकडे काल रात्रीच सुरू करण्यात आलेल्या एव्हरेस्ट शिखराच्या अंतिम चढाईला मात्र खराब हवामानामुळे तात्पुरती माघार घ्यावी लागली आहे. आज-उद्या हवामान सुधारताच ही चढाई पुन्हा केली जाणार आहे.
पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या वतीने या वर्षी ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच पर्वतरांगेवर ही दोन्ही शिखरे आहेत. एक जगातील सर्वोच्च, तर दुसरे जगातील चार क्रमांकाचे! उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गणेश मोरे, आनंद माळी, भूषण हर्षे, आशिष माने, टेकराज अधिकारी आणि अजित ताटे हे गिर्यारोहक यात सहभागी झाले आहेत. यातील आशिष माने याने आज सकाळी ‘ल्होत्से’ शिखर सर केले.
आशिष काल दुपारीच ल्होत्से शिखराच्या ‘समीट कॅ म्प’वर पोहोचला होता. येथून त्याने काल रात्री अकराच्या सुमारास अंतिम चढाईस सुरुवात केली. रात्रभर चढाई केल्यानंतर आज सकाळी सातच्या सुमारास त्याने ल्होत्से शिखराच्या माथ्यावर पाऊल ठेवले.
‘माऊंट ल्होत्से’ची उंची २७९७० फूट असून जगातील दहा अवघड शिखरांमध्ये त्याचा समावेश केला जातो. हे शिखर पहिल्यांदा १९५६मध्ये स्वीस गिर्यारोहकांनी सर केले. पण त्यानंतर फारच कमी गिर्यारोहकांना या शिखराने आपल्या माथ्यापर्यंत येऊ दिले. हे यश संपादन करणारा आशिष या मोहिमेतील वयाने सर्वात लहान गिर्यारोहक असून, त्याने गेल्या वर्षी ‘एव्हरेस्ट’ शिखरही सर केलेले आहे. मूळचा सातारा जिल्हय़ातील असलेला आशिष सध्या पुण्यात संगणकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
दरम्यान, या मोहिमेतील उमेश झिरपे, गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे या दुसऱ्या गटानेही काल रात्रीच एव्हरेस्टच्या दिशेने मोहीम सुरू केली होती. पण अतिथंड आणि वेगवान वाऱ्यामुळे त्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. एव्हरेस्ट माथ्याच्या अगदी जवळ ‘साऊथ कोल’ भागापर्यंत हे गिर्यारोहक पोहोचले असून, हवामानाचा अंदाज घेत ‘एव्हरेस्ट’ची ही चढाई ते पुन्हा सुरू करणार आहेत.