पुणे : मंदिर, मशीद बांधण्यापेक्षाही रुग्णालयाची उभारणी करून विविध जाती-धर्मातील लोकांची उत्तम सेवा घडते, असे मत आचार्य पुलकसागर महाराज यांनी व्यक्त केले. रसिकलाल धारिवाल यांचा हाच वारसा कुटुंबीय पुढे नेत आहेत, असा गौरव त्यांनी केला. आर. एम. डी. फाउंडेशनतर्फे नाशिक येथे उभारण्यात आलेल्या १६५ खाटांच्या रसिकलाल माणिकचंद धारिवाल हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटर या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्धाटन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी पुलकसागर महाराज यांचे प्रवचन झाले. फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन, उपाध्यक्षा शोभा धारिवाल, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, डॉ. आभाश्रीजी म. सा., श्री विभाश्रीजी म. सा., सुमेरकुमार काळे, नंदलाल पारेख या वेळी उपस्थित होते. नाशिक येथील महावीर इंटरनॅशनलतर्फे शोभा धारिवाल यांना भामाशाह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुग्णसेवेसारखी दुसरी सेवा नाही. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक जेवढा महत्त्वाचा तेवढाच करोना काळात रुग्णांचे जीव वाचविणारा डॉक्टर महत्त्वाचा आहे, असे भुजबळ यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वेळेवर आरोग्य सेवा पुरविली जाणार असून मानवता हाच खरा धर्म याचे पालन केले जाईल, असे शोभा धारिवाल यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी मदत मागणाऱ्याला कधीच विन्मुख पाठविले नाही, असे जान्हवी धारिवाल-बालन यांनी सांगितले.