शून्यातून सुरुवात करून उद्योजक म्हणून नाव कमवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी पहिला काही काळ खूप संघर्षांचा असतो. कोणता व्यवसाय सुरू करू, त्या व्यवसायासाठी काय लागते, भांडवल कुठून आणायचे, आव्हानांना तोंड देऊनही व्यवसाय टिकेल कसा, असे अनेक प्रश्न ‘भावी’ उद्योजकांच्या मनात असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करणारी पुण्यातील एक संस्था म्हणजे ‘दे आसरा फाऊंडेशन.’ या संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती दिली आणि माहिती तंत्रज्ञानातून बाहेर पडून सामाजिक क्षेत्रात काम करताना या क्षेत्राने आपल्याला कसे समाधान दिले, तेही सांगितले.
व्यवसायाबद्दल उद्योजकांच्या मनात स्पष्टता आणण्यापासून त्याला भांडवल मिळणे सोपे करण्यापर्यंतची कामे करणारी संस्था म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ‘दे आसरा फाऊंडेशन’ या संस्थेने एक ओळख मिळवली आहे. मग लहान उद्योजकांसाठी तब्बल ७५ व्यवसायांची ‘यूझर मॅन्यूएल्स’- अर्थात मार्गदर्शिका बनवणे असो, किंवा उद्योजकांना बँकेकडून भांडवल मिळवून दिल्यानंतरही त्यांच्या व्यवसायावर लक्ष ठेवणे आणि कुठे काही गडबड होत असेल तर तशी कल्पना देणे असो. उद्योजकांना सहसा उपलब्ध न होणाऱ्या सेवा या संस्थेने उपलब्ध करून दिल्या. डॉ. आनंद देशपांडे आणि सोनाली देशपांडे यांनी सुरू केलेल्या या संस्थेचे काम प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले या सांभाळतात. माहिती तंत्रज्ञानात अंतिम ग्राहकाशी बहुतेकदा थेट संपर्क येत नाही. अशा क्षेत्रात अनेक वर्षे यशस्वीपणे काम केलेल्या प्रज्ञा यांना ‘दे आसरा’च्या कामात पूर्णत: वेगळे काहीतरी शिकण्याची संधी दिसली. उद्योजकांशी येणारा प्रत्यक्ष संपर्क आणि त्यांना मदत झाल्यानंतर वाटणारे समाधान गोडबोले यांनाही बरेच काही देऊन गेले.
प्रज्ञा या खरे तर अभियांत्रिकीच्या पदवीधर. ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन’ या विषयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि नंतर कॅनडामध्ये जाऊन संगणशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कॅनडातील एका कंपनीत त्यांनी सात वर्षे काम केले. भारतात परतून त्यांनी ‘पर्सिस्टंट’मध्ये नोकरी सुरू केली. तिथेही त्या दहा वर्षे काम करत होत्या. प्रकल्प व्यवस्थापन आणि पुरवठा व्यवस्थापन हे त्यांच्या कामाचे प्रमुख क्षेत्र होते. नंतर मात्र सॉफ्टवेअर क्षेत्रातून बाहेर पडून काहीतरी वेगळा मार्ग चोखाळावा असे त्यांना वाटू लागले. ‘पर्सिस्टंट’चे डॉ. आनंद देशपांडे यांनी तेव्हा ‘दे आसरा’ची संकल्पना मांडली. समाजात अधिक नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे, असे त्यांना प्रकर्षांने वाटत होते. त्या अनुषंगाने गोडबोले यांनी माहिती तंत्रज्ञानातील नोकरी सोडल्यानंतर ही कल्पना पुढे नेण्यासाठी हातभार लावावा, असे देशपांडे यांनी सुचवले. गोडबोलेंनाही तो विचार पटला आणि ‘दे आसरा’च्या चमूचा त्या एक अविभाज्य भाग बनल्या.
सामाजिक संस्था चालवण्यासाठी काय लागते, हे गोडबोले यांनी जवळून पाहिले होते. त्यांची आई म्हणजे गतिमंदांसाठीची ‘प्रिझम फाऊंडेशन’ आणि स्वमग्न मुलांसाठीचे ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’ या दोन्ही संस्थांमधील कामामुळे विख्यात असलेल्या पद्मजा गोडबोले. त्या बाळकडूमुळे ‘दे आसरा’चा विचार पटकन आत्मसात करणे प्रज्ञा यांना सोपे गेले. ‘दे आसरा’ २०१५ फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धडपड करणाऱ्यांसाठी पुरेशा नोकऱ्या उपलब्ध नसणे हा मोठा प्रश्न. नोकऱ्या निर्माण करायच्या असतील तर आधी नोकऱ्या देणारे तयार व्हायला हवेत, हे त्याचे सरळ उत्तर. संस्थेने यावरच लक्ष केंद्रित केले आणि इतरांना नोकऱ्या देऊ शकतील अशा ‘भावी’ उद्योजकांना प्रोत्साहन देणे संस्थेचे उद्दिष्ट बनले. संस्थेच्या माध्यमातून २०२० पर्यंत एक लाख नोकऱ्या तयार व्हायला हव्यात, असे ध्येय संस्थेने ठरवले, असे गोडबोले नमूद करतात.
नोकऱ्या तयार करणारी महत्त्वाची मंडळी म्हणजे लहान उद्योजक. ब्यूटी पार्लरपासून बेकरी व्यवसायापर्यंतचा प्रत्येक लहान उद्योग किमान दोन ते बारा व्यक्तींना नोकरी देतो. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्तपन्नातही या उद्योगांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्रात उतरून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणे संस्थेला महत्त्वाचे वाटले. असे २५ हजार उद्योग उभे राहिले तरी १ लाख नोकऱ्यांचे उद्दिष्टय़ गाठता येणार होते. यातून एक अफलातून संकल्पना आली. ती म्हणजे उद्योगाच्या ‘यूझर मॅन्यूअल’ची. या ‘दे आसरा’ने जे लहान उद्योग नोकऱ्या तयार करू शकतील त्यांची यादी केली. त्यातील उद्योगांचा परिपूर्ण अभ्यास करून तो सुरू करण्यासाठी भावी उद्योजकाने काय काय करावे, याच्या पायऱ्या या ‘यूझर मॅन्यूएल’मध्ये देण्यात आल्या. आतापर्यंत संस्थेने अशा ७५ मार्गदर्शिका बनवल्या आणि त्या आपल्या ६६६.ीिं२१ं.्रल्ल या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या. या संकेतस्थळावर नोंदणी करून या मार्गदर्शिका मराठी आणि इंग्लिशमध्येही वाचता येतात. विशिष्ट उद्योग करताना गुंतवणूक व खर्च किती करावा लागेल, व्यवसायातून ठराविक नफा मिळवण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याची पडताळणी करता येते. उद्योजकाला पुढचे निर्णय घेण्यासाठी त्याची मदत होते. कोणत्या उद्योगासाठी कोणकोणते परवाने घ्यावेत, त्याची प्रक्रिया काय, हेही संस्था सांगते.
या मार्गदर्शिका वैशिष्टय़पूर्ण असल्या तरी संगणक साक्षर नसलेल्यांचा आणि केवळ मार्गदर्शिकेने समाधान न होणाऱ्यांचा प्रश्न उरतोच.पण त्यावरही ‘दे आसरा’कडे उपाय आहे. मार्गदर्शिकेमध्ये जे लिहिले आहे तोच मजकूर प्रत्यक्ष भेटीत समजावून सांगणारे ‘उद्योग मित्र’ त्यांनी तयार केले आहेत. ही मंडळी वाणिज्य किंवा व्यवस्थापन शाखेची किंवा या क्षेत्रातील अनुभव असलेली असल्यामुळे प्रत्यक्ष समुपदेशन अधिक प्रभावी ठरते. लहान उद्योगांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न हा भांडवलाचाच. त्यासाठी ‘दे आसरा’ने तीन बँकांबरोबर करार केले आहेत. इतर काही बँकांशीही या संदर्भात संस्थेचे चांगले संबंध आहेत. व्यवसाय चालण्याच्या दृष्टीने व्यवसायाच्या प्रस्तावावर आधी विचार केला जातो. या मार्गातील धोका शक्य तितका कमी करून नंतर तो प्रस्ताव बँकेकडे सादर केला जातो. अशा प्रकारे ज्या उद्योजकाला बँकेकडून भांडवल उपलब्ध होते, त्यांच्या प्रत्यक्ष कामाचा संस्था वेळोवेळी आढावा घेत असते. त्यामुळे व्यवसायात जेव्हा काही कमी पडत असल्याचे जाणवते, त्याची पूर्वकल्पना संस्था उद्योजकाला आणि प्रसंगी बँकेलाही देऊ शकते. बँकांच्या भांडवलाबरोबरच कोणत्या सरकारी योजनांमध्ये उद्योग बसू शकतो का, हेही संस्था तपासते. अनेकदा अशा योजनांची फारशी माहिती भावी उद्योजकांना नसते.
उद्योजकाला उद्योग सुरू करताना इतरही काही सेवांची मदत लागते. न्यायविषयक सल्ला देणारी मंडळी, चार्टर्ड अकाऊंटंट, पॅकेजिंग आणि बारकोडिंगची माहिती देणारे लोक, निर्यातीविषयी मार्गदर्शन करणारे, अशा विविध सेवा ‘दे आसरा’ उद्योजकांसाठी उपलब्ध करून देते. ‘दे आसरा’चे सदस्यत्व घेण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यानंतर संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांचा वापर ते करू शकतात. अर्थात संस्थेबाहेरील सल्लागारांच्या सेवेसाठी त्यांना त्या त्या सेवेनुसार शुल्क भरावे लागते. ही संस्था देशपांडे यांची असल्यामुळे सध्या संस्थेला आर्थिक मदत तेच पुरवतात. सध्या संस्था अर्थप्राप्तीचा विचार करत नाही, परंतु ३ ते ६ महिन्यांनी सेवांसाठी काही शुल्क आकारण्याचा संस्थेचा विचार आहे, असे गोडबोले यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत वीस हजार इच्छुक उद्योजकांनी ‘वेब कन्टेंट’ वापरण्यासाठी संस्थेकडे नोंदणी केली आहे, तर ५ हजार लोकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गदर्शन घेतले आहे. त्यातून २१० उद्योजकांना संस्थेकडून कोणत्या तरी प्रकारे मदत झाली, असे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून संस्थेचे ध्येय- म्हणजे १ लाख नोकऱ्या तयार करणे ही एका अर्थी गोडबोले आपली जबाबदारी मानतात. संस्थेकडे येणाऱ्या उद्योजकांना खरोखर फायदा होतो आहे का, याचा आढावा त्यांना घ्यावा लागतो, शिवाय ही संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना कंपन्यांचे ग्राहक बहुतेक वेळा अमेरिकेतीलच होते. त्यामुळे सॉफ्टवेअर पुरवताना अंतिम ग्राहक कोण, त्याला आपल्या कामाचा काय उपयोग झाला, हे प्रत्यक्ष पाहायला मिळत नसे. ‘दे आसरा’मध्ये मात्र सेवा वापरणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क तर येतोच, शिवाय त्याला या सेवांचा फायदा झाल्यावर त्याच्या कुटुंबाचे आयुष्य बदललेलेही पाहायला मिळते, असे गोडबोले सांगतात. हे समाधान आणि रोज नवीन काहीतरी शिकण्याची संधी त्यांना महत्त्वाची वाटते.
संपदा सोवनी – sampada.sovani@expressindia.com