रक्षा बंधन सणाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी विशेष राखी पाठवली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचारया प्रश्नांवर आधारीत विशेष राखी तयार करत लक्ष्मी रोडवरील पोस्ट ऑफिसमधून पाठविण्यात आली आहे. यावेळी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मृणालिनी वाणी, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

“रक्षा बंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचा असून या दिवशी बहिणींने भावाला राखी बांधल्यावर भाऊ भेट वस्तु देतो. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन भावंडांना राखी पाठवत आहोत. त्यांनी राज्यातील भगिनींसमोर असलेल्या महागाई,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या,महिलांवरील अत्याचार अशा समस्यांतून मुक्ततता करावी, हीच रक्षाबंधनाची भेट आमच्यासाठी राहिल. सर्व भगिनींच्या या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण केल्या जातील असा आमचा विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर आघाडीच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांनी दिली आहे.