वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातूनच जलसंपदा विभागात भ्रष्टाचार होतो. राजकीय पातळीवरील भूकंपामुळेच हा विभाग सतत प्रसिद्धीच्या झोतामध्ये असल्याचे मत जलसंपदा विभागातील निवृत्त अधीक्षक अभियंता भाऊसाहेब नेवरेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.नवीन उद्योग प्रकाशनतर्फे नेवरेकर यांनी लिहिलेल्या ‘जलसंपदा आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (१४ जून) न्या. बी. जी. कोळसे-पाटील, ज्येष्ठ नेते भाई वैद्य आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे, अशी माहिती प्रकाशक नवीन इंदलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या निमित्ताने नेवरेकर यांनी संवाद साधला. नेवरेकर म्हणाले, शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर असताना भ्रष्टाचारामुळे जलसंपदा विभाग चर्चेत आला. तत्कालीन मंत्री महादेवराव शिवणकर यांना राजीनामा द्यावा लागला. पण, भ्रष्टाचाराचा मूळ प्रश्न तसाच राहिला. विभागातील वरिष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांमुळे जलसंपदा विभागाचा कार्यभार असलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पांढरे यांच्यामुळे अस्वस्थ झालेल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका सातत्याने सुरू होत्या. मात्र, अजित पवार यांच्या राजीमान्यानंतर अधिकारी निर्धास्त झाले.