कुरकुंडी (ता. खेड, जि. पुणे) येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करून त्यांना जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हे तिन्ही मृतदेह उकिरड्यात पुरण्यात आले होते. गोगावले कुटुंबातील पती-पत्नी व त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीची अज्ञातांनी निर्घूण हत्या करून त्यांना पुरले होते. ही घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली.
कुरकुंडी गावातील राळेवस्ती येथे रोहिदास गोगावले (वय ४५) पत्नी नंदा (वय ४०) व मुलगी अंकिता (वय १२) यांच्यासह राहत होते. या तिघांचे मृतदेह आज सकाळी ११ च्या गावातील चारीच्या उकिरड्यात पुरल्याचे आढळून आले. त्यांची हत्या कधी करण्यात आली, हत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना कधी घडली हेही समजू शकलेले नाही. त्या दृष्टीने चाकण पोलीस तपास करत आहेत. गोगावले कुटुंबीयांच्या हत्येमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास करत असून अद्याप त्यांना कोणतेही धागेदोरे मिळू शकलेले नाहीत.