रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक विचार व मुख्यमंत्र्यांशी बैठकीचे आश्वासन मिळाल्यामुळे १५ व १६ एप्रिलला होणारा रिक्षाचा बंद स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे निमंत्रक व राज्य कृती समितीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली.
सीएनजी सक्ती व पुरवठा, इलेक्ट्रॉनिक मीटर, विद्यार्थी वाहतूक क्षमता, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना आदी विषयांबाबत रिक्षा संघटनांच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर रिक्षा चालकांनी १५ व १६ एप्रिलला बंद पुकारण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन आयुक्त विठ्ठल मोरे यांनी आज राज्य कृती समितीबरोबर बैठक घेतली. पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या बैठकीत सहभाग घेतला. आमदार मोहन जोशी हेही बैठकीला उपस्थित होते.
बैठकीबाबत पवार यांनी सांगितले की, लोकसंख्येनुसार रिक्षाचे परमिट वाढविण्याची आमची मागणी होती. ही मागणी मार्गी लागणार आहे. जनगणनेनुसार रिक्षांच्या गरजेबाबत परिवहन आयुक्तांनी तपशीलवार प्रस्ताव पाठविला आहे. रिक्षाच्या रचनेत काही बदल केल्यास व त्यानुसार प्रस्ताव दिल्यास रिक्षात विद्यार्थ्यांच्या आसन क्षमतेत वाढ करण्याचे आश्वासनही मिळाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी १० मे पूर्वी बैठक होणार असून, त्यात सीएनजीचा पुरवठा, इलेक्ट्रॉनिक मीटर व कल्याणकारी मंडळाबाबतच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ठरली असल्याने व काही मागण्या मार्गी लागल्या असल्याने रिक्षाचा बंद स्थगित करण्यात आला आहे.