‘वैकुंठ नायका.. आनंद बलनायका’ हा संत विठामहाराजांचा अभंग.. ‘विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा’ ही संत एकनाथमहाराजांची रचना.. संत चोखोबांचा ‘अनादी निर्मळ, वेदांचे जे मूळ’ हा अभंग.. ‘गुरु हा संतकुळाचा राजा’ ही संत ज्ञानेश्वरांची रचना.. आजवर कधीही सादर न झालेल्या या अभंगांचे चार घराण्याच्या गायकांनी गायन करीत पांडुरंगांची स्वराधना केली.
श्री संत सेवा संघ आणि खडके फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित ‘वैकुंठ नायका’ कार्यक्रमात किराणा घराण्याचे आनंद भाटे, मेवाती घराण्याचे संजीव अभ्यंकर आणि जयपूर घराण्याचे रघुनंदन पणशीकर यांनी श्रोत्यांना भक्तिरसाची अनुभूती दिली. जीवन धर्माधिकारी यांनी या अभंगांची स्वररचना केली होती. ‘वैकुंठ नायका’ या अभंगरचनांच्या सीडी आणि या अभंगांवरील निरुपण पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि सहकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते झाले. श्री संत सेवा संघाचे संजय गुरुजी, खडके फाउंडेशनचे संजीव खडके, केदार खडके, बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे शिरीष देशपांडे या वेळी उपस्थित होते.
शेजवलकर म्हणाले, समाजामध्ये सध्या अनेक अनिष्ट गोष्टी घडत आहेत. कुटुंबव्यवस्था मोडकळीस येत आहे. अशा परिस्थितीमध्ये संत सेवा संघ संतांचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे करीत असलेले काम हे कौतुकास्पद आहे.