भारताच्या विकासामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वाटा हा अतुलनिय आहे. सध्याच्या घडीला या क्षेत्रात मरगळीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते. पिंपरी-चिंचवडमधील अभियंत्यांच्या वाढत्या आत्महत्येमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या विकास खुंटतोय की काय अशी भीत निर्माण झाली आहे. कंपनी धोरणासोबतच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या देशांनी भारतीयांच्या विसावर आणलेले निर्बंध ही याला कारणीभूत ठरत आहेत. हे निर्बंध परदेशातील अभियंत्यांना घरवापसी करायला लावणारे आहेत. याचा परिणाम भारतात असणाऱ्या कंपन्यांवर ही होताना दिसतो. परिणामी कंपनी मालक कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबत आहेत. यामुळे तरुणाईमध्ये निराशा वाढवत आहे. यातूनच आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात.

या क्षेत्रातील निराशेच्या वातावरणात पुन्हा आशा पल्लवित करण्यासाठी काही तरुण खास उपक्रमाद्वारे कार्यरत झाले आहेत. शहरातील संगणक अभियंत्यांनी आपली आवड जोपासत मराठी आणि हिंदी रॅप तयार केले. ही टीम गेल्या अडीच वर्षांपासून नोकरी करत रॅप च आपलं स्वप्न जोपासत आहे. ‘टीम स्टारडम एम्पायर’ या नावाने ही तरुणाई आयुष्य आनंदी जगण्याचा संदेश देत आहे. त्यांनी या उपक्रमात ‘द पुणेकर’, ‘गणपती बाप्पा मोरया’ हे रॅप शो केले आहेत. नोकरी करत असताना मानसिक ताणतणावात वावरतात परंतु त्यांचा तणाव हा रॅपच्या माध्यमातून निघून जातो, या विचारातून ही मंडळी कार्यरत आहे. लवकरच महिलांच्या यशोगाथा सांगणारा ‘सबसे अनोखी तू’ या नावाचा रॅप येत आहे. ‘माँ जिजाऊ’ , ‘सावित्रीबाई फुले’, ‘राणी लक्ष्मी बाई’, ‘झाशीची राणी’,आणि ‘किरण बेदी’, ‘लता मंगेशकर’ यांच्या यशोगाथेतून नवा उत्साह देण्याचा प्रयत्न ही टीम करणार आहे. हा रॅप तयार करण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांचा कालावधी घेतला असून निराशेत असणाऱ्यांमध्ये नवी आशा पल्लवीत होण्यास मदत होईल, असा विश्वास या टीमने व्यक्त केलाय. जसप्रीत भट्टो, आदीश अंबोरे, निलेश देशमुख, योगेश खळदकर, शिवानी देशपांडे, जयराज भिसे, अभिनव जैस्वाल, मनप्रीत गिल, संतोष चौधरी यांनी या रॅपसाठी मेहनत घेतली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विविध भागात राहणाऱ्या दहाहून अधिक अभियंत्यांनी गेल्या वर्षभरात जीवनयात्रा संपवली. यासोबतच अभियंत्यांचा मुक्त वावर, शैली आणि व्यसनाधीनता ही याला कारणीभूत आहे. राहटणी येथे १७ मे ला इमारतीवरून उडी मारून निनादने आत्महत्या केली. २ एप्रिल २०१७ ला जीशन शेख या पिंपळे गुरवमधील अभियंत्याने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवले. तर १७ मार्च २०१७ ला दिघी येथील राजू तिवारी या अभियंत्याने पत्नीसह विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याच बरोबर ३ फेब्रुवारी २०१७ ला अभिषेक यादव या अभियंत्याने हिंजवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समोर आले होते. या घटना रोखण्यासाठी आवडी निवडी जोपासत निराशेतून आशेचा किरण निर्माण केल्याचा ‘टीम स्टारडम एम्पायर’ प्रेरणादायी संदेश देत आहेत.