आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता सर्व आदिवासींनी एकत्र येऊन हक्कासाठी लढले पाहिजे, असे मत ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वहारूदादा सोनवणे यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड आदिवासी समाजाच्या वतीने क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी अभिनेते वीरा साथीदार, नगरसेवक रामदास बोकड, आशा सुपे आदी उपस्थित होते.
सोनवणे म्हणाले, आदिवासींना महान संस्कृतीची देणगी आहे. आदिवासींच्या परंपरेचे रक्षण प्रत्येक आदिवासींनी केले पाहिजे. या वेळी व्याख्याते सांगल्याभाई वळवी यांचे ‘आदिवासी जीवनाची मूलतत्त्वे’, सतीश पेदाम यांचे ‘आदिवासी चळवळीत आदिवासी युवकांचे योगदान काय असावे?’ तसेच डॉ. संजय लोहकरे यांचे ‘राघोजी भांगरे, बिरसा मुंडा व आजचा आदिवासी युवक’ या विषयावर व्याख्यान झाले. मोहन उंडे यांनी प्रास्तविक केले. मोहन कवटे आणि प्रणिता घोडे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय कोकाटे यांनी आभार मानले.