आयपीएल मधील फिक्सिंगची प्रकरणे शोधण्याच्या कामात देशभरातील पोलीस गुंतल्यामुळे ही स्पर्धा म्हणजे आता इंडियन पोलीस लीग झाली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या स्पर्धेवर टीका केली. ‘अब कोई नही बचेगा’ हे या स्पर्धेचे घोषवाक्यही आता तंतोतंत खरे होणार आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत विचारविनिमय तसेच कामाचा आढावा आणि आगामी निवडणुकांसंबंधी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी ठाकरे पुण्यात आले होते. पक्षाचे नेते सुभाष देसाई, लीलाधर डाके, प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गजानन बाबर, आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, गटनेता अशोक हरणावळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पक्षबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी आयपीएलवर चांगलीच टीका केली. बडे खेळाडू आणि बुकी या स्पर्धेच्या गैरव्यवहारांमध्ये अडकल्यामुळे आयपीएलचे अब कोई नही बचेगा हे घोषवाक्य आता तंतोतंत खरे होईल, असे ते म्हणाले.
विधानसभानिहाय उपशहरप्रमुख
पुणे शहराचा वाढता पसारा लक्षात घेता संपूर्ण शहराचा व्याप सांभाळणे एका शहरप्रमुखाला यापुढे शक्य होणार नाही. त्यामुळे पुण्यात यापुढे एक शहरप्रमुख न नेमता मुंबईप्रमाणेच विधानसभा मतदारसंघनिहाय उपशहरप्रमुख नेमले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. पक्षाची ताकद कायम आहे. फक्त संघटनात्मक सोयीनुसार लवकरच काही निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले.
नगरसेवकांना परत पाठवले
बैठकीच्या ठिकाणी पक्षाचे पुण्यातील नगरसेवक दुपारी तीनपूर्वीच पोहोचले होते. दुपारी तीन वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे हे उद्धव ठाकरे यांना समजल्यानंतर त्यांनी सर्वाना महापालिकेत जायला सांगितले. सभेचे कामकाज आणि तेथील तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे. तेव्हा आधी सभेला जा आणि सभा संपल्यानंतर आपल्या बैठकीत या, असे ठाकरे यांनी सांगितल्यानंतर पक्षाचे सगळे नगरसेवक तातडीने महापालिकेत पोहोचले.

‘वाघाचा दरारा निर्माण करा’
हिंदूंच्या देशात आज हिंदूच पोरका झाला आहे. त्यामुळे हिंदूंना बळकटी देण्यासाठी शिवसेनेच्या वाघाचा दरारा निर्माण करा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना दिला. इतरांना सल्ला देण्यापेक्षा आधी तुमच्या पुतण्याला चांगले बोलायला शिकवा, असा टोला त्यांनी यावेळी शरद पवार यांना दिला. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचीच सत्ता असल्यामुळे भ्रष्टाचाराला बळकटी मिळाली आहे. दोन्ही काँग्रेसचे साटेलोटे असल्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्या भांडणात सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. या सर्वसामान्याला दिलासा देण्यासाठी महायुतीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.