पिंपरी : पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अक्षय तृतीया आणि जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी यावेळी उपस्थित होते.
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा व्यवस्थित वापर करणे आवश्यक आहे. वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. विविध सेवाभावी संस्था, औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घेऊन शहरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आपले योगदान द्यावे, असे सिंह म्हणाले.
यावर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना ‘इन्व्हेस्ट इन अवर’ अशी आहे. मधमाशी हा जगातील अत्यंत महत्त्वाचा कीटक असून मधमाशा या परागीकरण करण्यासाठी मदत करत असतात. मोठ्या प्रमाणात फळे व अन्यधान्यांची निर्मिती परागीकरणातून होत असते. त्यामुळे मधमाशांचे जतन करण्याची काळाची गरज आहे. मधमाशांची संख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे. भविष्यामध्ये मधमाशा राहिल्या नाहीत, तर प्राणीसुद्धा नष्ट होण्याचा धोका उद्भवू शकतो. यामुळे मधमाशांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे सिंह यांनी सांगितोल.
दिघीत १८ एकर क्षेत्रावर झाडांची लागवड
ग्रीन यात्रा या संस्थेमार्फत दिघी येथील कै. रामभाऊ गबाजी गवळी बालउद्यान येथे १८ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने झाडांची लागवड करण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्यातील झाडांना एक वर्ष झाले. या वर्षात झाडांची वाढ पाच ते सहा फुटांपर्यंत झाल्याचे दिसून येत आहे.