दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात ४१ स्त्रियांची नोंदणी

देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेस दहा दिवस देखील पूर्ण झालेले नसताना ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुण्यातील एकमेव रुग्णालयाकडे ४१ महिलांनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर गुजरात, चंडीगढ, तेलंगण, चेन्नई आणि ईशान्य भारतातील स्त्रियांचाही समावेश असून या सर्व स्त्रियांना त्यांच्या माता गर्भाशय देण्यास तयार झाल्या आहेत. आर्यलड येथून दोन आणि लंडनमधूनही एका स्त्रीने नोंदणी केली आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

पुण्यातील ‘गॅलेक्सी केअर’ रुग्णालयात १८ मे रोजी देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. अशाच प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया लगेच १९ मे रोजी झाली. या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये सोलापूर व गुजराजमधील तेवीस वर्षांच्या मुलींना त्यांच्या अनुक्रमे ४१ व ४२ वर्षांच्या मातांनी गर्भाशय दिले होते. यातील एका मुलीला गर्भाशयच नव्हते, तर दुसरीला ‘अशरमॅन्स सिंड्रोम’ नावाचा आजार असल्यामुळे गर्भधारणा होत नव्हती. आता रुग्णालयाकडे नोंदणी केलेल्या स्त्रियांपैकीही १० मुलींना जन्मत:च गर्भाशय नाही. आठ जणींचे गर्भाशय आधी झालेल्या बाळंतपणात गुंतागुंती उद्भवल्यामुळे काढावे लागले. चार मुलींना तरुण वयातच कर्करोगामुळे गर्भाशय काढावे लागले, तर ४ ते ५ मुलींना ‘अशरमॅन्स सिंड्रोम’ आजार आहे,अशी माहिती ‘गॅलेक्सी’चे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.

पहिल्या दोन प्रत्यारोपणांनंतर त्या रुग्णांच्या वारंवार ‘डॉपलर’ चाचण्या केल्या जात असून त्यांच्या शरीरात जंतूसंसर्ग किंवा गर्भाशय स्वीकारले न जाण्याची लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे पुणतांबेकर यांनी सांगितले. शस्त्रक्रियेस २१ दिवस पूर्ण झाल्यानंतर या स्त्रियांचा दिनक्रम हळूहळू सुरू होईल. तीन महिन्यांनंतर त्या शारीरिक संबंध देखील ठेवू शकतील. त्यांच्या स्त्रीबिजांपासून प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून ते गोठवून ठेवण्यात आले असून प्रत्यारोपणानंतर घ्याव्या लागणाऱ्या ‘इम्यूनोसप्रेसंट’ औषधांचा डोस कमी झाल्यावर हे भ्रूण त्यांच्या गर्भाशयात सोडण्यात येतील. त्याद्वारे त्यांना गर्भधारणा होऊ शकते. ‘सीझेरियन’द्वारे बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भाशय पुन्हा काढून टाकले जाते. प्रत्यारोपित केलेले गर्भाशय शरीरात पाच वर्षांपर्यंत राहू शकते, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

स्वीडनमध्ये ज्यांनी प्रथम गर्भाशय प्रत्यारोपण केले त्या सर्जनने एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत पुण्यातील डॉक्टरांच्या चमूने आपल्याकडे प्रशिक्षण घेतले नसल्याचे म्हटले आहे, तसेच पुण्यातील डॉक्टरांची या शस्त्रक्रियेसाठी तयारी झालेली नव्हती व त्यामुळे रुग्णाचा जीव ते धोक्यात घालत आहेत, असा आरोप त्यांनी या मुलाखतीत केला होता. याविषयी डॉ. पुणतांबेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले,‘‘आम्ही मृतदेहांवर ही शस्त्रक्रिया करण्यास शिकलो.

स्वीडनच्या डॉक्टरांकडून केवळ शस्त्रक्रियेतील नियम (प्रोटोकॉल) समजून घेतले होते. शिवाय मला ‘कॅन्सर सव्‍‌र्हिक्स’ क्षेत्रातील अनुभव आहे. या डॉक्टरांच्या आरोपांना आम्हाला उत्तर द्यायचे नाही.’’

‘गर्भाशय बसवा, मग मुलगा लग्नासाठी तयार होईल!’

गर्भाशयाची पिशवी प्रत्यारोपित केल्यानंतर पाच वर्षांच्या आत मूल होणे आवश्यक असते. त्यानंतर गर्भाशय काढून टाकावे लागते. असे असताना लग्न न झालेल्या स्त्रियांकडूनही रुग्णालयाकडे विचारणा होते आहे. ‘गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलेल्या तीन अविवाहित मुलींनी ‘आयआयटी’मधून शिक्षण घेतले आहे. त्यांना गर्भाशय नसल्यामुळे प्रत्यारोपण करून घ्यायचे आहे. प्रत्यारोपण करा, म्हणजे मुलगा लग्नास तयार होईल, असे त्या म्हणतात. परंतु गर्भाशय प्रत्यारोपणाचा मूळ उद्देश अपत्यप्राप्ती असा असल्यामुळे अविवाहित स्त्रियांवर ते करणे कायद्यानुसार योग्य आहे की नाही, हे माहीत नाही. त्यामुळे त्यांची केवळ नोंदणी करून घेतली आहे,’ असे डॉ. पुणतांबेकर यांनी स्पष्ट केले. ‘आम्हाला मूल हवे होते म्हणून गर्भाशय प्रत्यारोपणास तयार झालो. मूल दत्तक घेण्याची किंवा भाडोत्री मातृत्त्वाद्वारे अपत्यप्राप्ती करून घेण्याची इच्छा नव्हती,’ असे प्रत्यारोपण झालेल्या दोन्ही स्त्रियांच्या पतींनी सांगितले. यातील एका स्त्रीच्या पतीचा यांत्रिकीतील व्यवसाय आहे, तर एकीचा पती केशकर्तनालय चालवतो.