“काही प्रमाणात आपण सर्वच मनोरुग्ण असतो आणि आपल्यातील प्रत्येकालाच मानसोपचाराची गरज असते,” असे मत जेष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. ते पुण्यात परिवर्तन संस्थेच्या किरण गटाने आयोजित केलेल्या ‘रंग मनाचे’ या कार्यक्रमात बोलत होते. जागतिक स्किझोफ्रेनियादिवसाच्या निमित्ताने या आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्किझोफ्रेनिया आजाराचा सामना करत असलेल्या मुलामुलींनी या कार्क्रमात गाणी, कविता, नृत्य यांचे बहारदार सादरीकरण केले. ज्येष्ठ लेखक राजन खान व रंगकर्मी अतुल पेठे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.

राजन खान म्हणाले, “जगाशी जुळवून न घेता येणं म्हणजे वेड असते आणि ते आपल्या सर्वात असते. एकमेकांवर विश्वास नसणं, दुसरा माणूस आपल्या पेक्षा कमी दर्जाचा असल्याची भावना ठेवणं आणि माणसा माणसात भेद करणे यामुळेच मानसिक अस्वस्थता आणि मानसिक आजार वाढत जातात. बुवा, बाबा, यांच्या नादाला लागू नका. सदोष स्पर्धा तुम्हाला मनोरुग्ण बनवते. जगणं महत्त्वाचं आहे का फक्त शिक्षण महत्त्वाचं? जगण्याच्या मागे वेड्यासारखं धावणं महत्त्वाचं.”

“जिंकण्या हारण्याचे भेद तीव्र होतात तेथे मनोरुग्ण बनतात”

“जिंकण्या हारण्याचे भेद जेथे तीव्र होतात तेथे मनोरुग्ण बनतात. त्यामुळे आपण आपणातले भेद कमी करू या. आपण जिवंत आहोत याचा आनंद साजरा करणं महत्त्वाचं. रुग्ण असणे हे पाप, वाईट नाही. ते निसर्गाचे देणे आहे. वेदना असतील तर उभे राहावे. गाणं, नाचणे यातील नाद जगायला प्रोत्साहित करते. म्हणून मानसरंगचा आजचा कार्यक्रम मला महत्त्वाचा वाटतो,” असं मत राजन खान यांनी व्यक्त केलं.

“बिघडलेल्या समाजाची मनस्थिती लेखकाला कळते”

अतुल पेठे म्हणाले, “अशा प्रकारच्या कार्यक्रमातून कौशल्य विकास करून आत्मविश्वास वाढवणे हे एक ध्येय असते. त्यामुळेच याआधी केलेले मानसरंग नाटय महोत्सव सारखे प्रयोग महत्त्वाचे ठरतात. बिघडलेल्या समाजाची मनस्थिती लेखकाला कळते. साहित्यातून सजग, संवेदनशील बनवणे तसेच भिंती तोडायचे काम लेखक, कलाकार, डॉक्टर व इतरांचे असते. त्यामुळे मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजारांसारख्या संवेदनशील विषयांची कोंडी फोडण्यासाठी कला हे उत्तम माध्यम आहे.”

हेही वाचा : विश्लेषण: ‘अतिकाम’ आरोग्यास हानीकारक; जाणून घ्या काय आहे ‘Hustle Culture’?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांशी यशस्वीपणे सामना केलेल्या मानसमित्रांनी आपले अनुभव आणि संघर्षाची कहाणी सर्वांना सांगितली. डॉ. हमीद दाभोलकर यांनी या सत्राचे प्रास्तविक केले. सकाळच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा कचरे, संगीता पुरंदरे आणि सुरेश डोंगरे यांनी केले तर आभार राजू इनामदार यांनी मानले.