[content_full]

भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्त्व आहे. भारतीय माणूस मुळातच उत्सवप्रिय आहे. आजच्या आधुनिक काळातही आपण पूर्वापार चालत आलेले सण, परंपरा पाळून आपली संस्कृती जपण्याचे काम करत असतो. मात्र, आता आधुनिक काळानुसार जुन्या परंपरांमध्ये बदल व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी विशिष्ट सण, उत्सव करण्यामागे काही कारणं होती. काहीवेळा धार्मिक, काही वेळा शास्त्रीय कारणं त्यामागे जोडलेली होती. त्यावेळी लोकांचे प्रबोधन ही सोपी आणि आजच्या एवढी सुलभ गोष्ट नसल्यामुळे, सण, उत्सवांच्या माध्यमातून तो उद्देश साध्य केला जात असे. दसऱ्याच्या सणालाही असेच अनेक अर्थांनी महत्त्व आहे. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. सीमोल्लंघनाचा दिवस म्हणूनही विजयादशमीचा सण साजरा केला जातो. प्राचीन काळी सीमोल्लंघन म्हणजे युद्धमोहिमेवर निघण्याचा दिवस, असा अर्थ होता. आधुनिक काळात तो बदलून त्याचा नवा अर्थ लावता येईल. उदाहरणार्थ, कधीही पार्टी न देणाऱ्या आपल्या ग्रुपमधल्या एखाद्या मित्राला हेरावे. दसऱ्याच्या दिवशी सुटी असणारच, त्यामुळे सगळ्यांनी आधीच नियोजन करून ठराविक वेळी एकत्र यावे. तो मित्र घरी असल्याची खात्री करून घ्यावी. त्याला आपल्या योजनेबद्दल ताकास तूर लागू देऊ नये. शक्य तेवढे सगळे मित्रमैत्रिणी गोळा करावेत आणि दसऱ्याला सीमोल्लंघन करून ऐन जेवणाच्या वेळी त्याच्या घरी घुसावे. ऐनवेळी मित्र आल्यानं तो चक्रावून जाईल, पण सणाचा दिवस असल्यामुळे त्याला कुणाशी वाईट बोलता येणार नाही. सहजच आल्याचा बहाणा करून वहिनींना विश्वासात घ्यावे, त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवावे. त्यांचे गुणगान करावे. जेवणाचीच वेळ असल्याने आणि स्वयंपाकघरातून सुग्रास भोजनाचे विविध वास येत असल्याने, घरी ठाण मांडून बसावे. `आता जेवूनच जा,` हे अमृतबोल मित्राच्या नाही, पण निदान वहिनींच्या तोंडून ऐकल्याशिवाय त्यांच्यावरचा स्तुतिसुमनउधळण कार्यक्रम अजिबात खंडित होऊ देऊ नये. सीताफळ रबडीसारख्या मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर अन्नदात्याला सुखी होण्याचे आशीर्वाद देऊनच घराबाहेर पडावे. दुसऱ्या दिवशी आफिसातल्या सर्व मित्रपरिवाराला आणि फेसबुक मित्रपरिवाराला ही खबर दिल्याशिवाय हे व्रत सुफळ संपूर्ण होत नाही, याचा विसर पडू देऊ नये. तथास्तु!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  •  १ लिटर दूध
  • पाव वाटी साखर
  • १/२ चमचा दूध मसाला
    किंवा
  • वेलची-जायफळ पूड, आवडीनुसार ड्रायफ्रुटस् चे काप
  • दोन वाट्या सीताफळाचा गर (सीताफळाच्या बिया काढून गर काढून घ्या.)

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • १ लिटर दूध जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर ठेवा.
  • दूध अधूनमधून ढवळत रहा. साधारण निम्मे झाले की साखर आणि दूध मसाला घालून ढवळा. १० मिनिटे उकळी आणून गॅस बंद करा.
  • दुसर्‍या पातेल्यात हे आटवलेले दूध काढून घ्या आणि थंड होऊ द्या. रबडी तयार होईल.
  • थंड झालेल्या रबडीत सीताफळाचा गर मिसळून छान ढवळून घ्या.
  • फ्रीज मधे ठेवून गार करा.
    (रबडी अजून घट्ट हवी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर थोड्या दुधात मिसळून घालावी.)

[/one_third]

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[/row]