लिपुलेख खिंडीवरील भारतीय स्वामित्वाला चीनने आधीच मान्यता दिलेली असल्यामुळे आता नेपाळमार्फत आक्षेप घेतला जातो आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारणपणे सरसकट समज असा की आपला सीमावाद फक्त चीन आणि पाकिस्तान यांच्याशीच आहे. तो काही प्रमाणात खरा असला तरी त्यात आणखी एका देशाची भर पडताना दिसते. तो देश म्हणजे नेपाळ. दोन अन्य देशांबरोबरचे सीमावाद रक्तरंजित असल्यामुळे आणि अजूनही धुमसते असल्यामुळे ते स्मरणात, चलनात आणि बातम्यांत अधिक असतात. त्यामुळे नेपाळसारख्या वीतभर शेजारी देशाचे पंतप्रधान ओ. पी. शर्मा ओली जेव्हा भारताबरोबर असलेला सीमावाद केवळ उकरूनच काढत नाहीत, तर वादग्रस्त नकाशा प्रसृत करून मोकळेही होतात, तेव्हा आपल्याकडल्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. भारताच्या हद्दीतील भूभागावर नेपाळचे स्वामित्व सांगून ते थांबत नाहीत. तर भारताच्या राजमुद्रेविषयी अनुदार उद्गारही काढू धजतात. ‘भारताच्या त्रिसिंहांकित अशोक स्तंभाच्या बुंध्यावर ‘सत्यमेव जयते’ हे वचन कोरलेले आहे. त्याचा वास्तवातील अर्थ सिंहांचा विजय असा आहे. पण सीमा मुद्दय़ावर सत्याचाच विजय होईल अशी नेपाळला खात्री आहे,’ असले विधान करण्यास एकाही नेपाळी नेत्याची जीभ रेटली नव्हती. ते ओली यांनी केले. सीमावादाचे वृत्त प्रसृत झाल्यावर लगेच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची ‘नेपाळचा बोलविता धनी वेगळाच आहे’ ही प्रतिक्रिया पुरेशी सूचक आहे. वास्तविक भारत आणि नेपाळ यांच्यादरम्यान असलेल्या १८०० किलोमीटर लांबीच्या सीमावर्ती भागापैकी केवळ दोन टक्केच भूभाग वादग्रस्त आणि म्हणून संवादाधीन आहे. भारताने ८ मे रोजी धारचुला-लिपुलेख रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर नेपाळ नाराज झाल्याचे वरकरणी वाटत असले, तरी यामागील सत्य आणखी गहिरे आहे. या रस्त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी लागणारा वेळ खूपच कमी होणार आहे. शिवाय इतर उपलब्ध मार्गाच्या तुलनेत हा मार्ग ८० टक्के भारतीय हद्दीतून जाणारा. त्याचे काम कित्येक महिने सुरू होते, त्या वेळी नेपाळकडून नाराजी व्यक्त झाली नव्हती. आता ती झाली, तेव्हा त्यामागील बोलविता धनी कोण आणि सिंह कोण यांचा वेध घेण्यापूर्वी नेमका वाद काय आहे, याविषयी विवेचन समयोचित ठरेल.

Web Title: Loksatta editorial on india nepal border dispute zws
First published on: 22-05-2020 at 02:28 IST