श्रीगोंदवलेकर महाराज यांनी भय्यासाहेब मोडक यांना विचारलं, तुम्हाला प्रपंच पाहिजे की परमार्थ? हे भय्यासाहेब मोडक गडगंज श्रीमंत होते. ब्रिटिश सरकारलाही ते कर्ज देत, अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे महाराजांवर निस्सीम प्रेम होते. फुलातून सुगंध जसा सहज यावा तशा खऱ्या स्वाभाविक सहजतेने ते अंत:करणपूर्वक उद्गारले, महाराज मला परमार्थ पाहिजे! श्रीमहाराज हसले आणि म्हणाले, ‘पाहा, नीट विचार करा; परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आल्यास हाती चौपदरी घ्यावी लागेल. आहे का तयारी?’ यावर भय्यासाहेब म्हणाले, ‘होय महाराज, आहे माझी तयारी!’ त्यावर, ‘बरे तर, राम तसेच करील,’ असे बोलून श्रीमहाराज स्वस्थ राहिले. पुढे कालांतराने या भय्यासाहेबांची आर्थिक स्थिती अतिशय खालावत गेली. इतकी की अखेरच्या काळात दुसऱ्याच्या औदार्यावर पोट भरण्याची वेळ त्यांच्यावर आली. तरी ते अत्यंत समाधानी असत. ‘महाराजांनी मला काय आनंदात ठेवलं आहे’, असंही ते अगदी सहजभावात म्हणत. आता प्रत्येकाची काही ‘भय्यासाहेब मोडक’ होण्याची पात्रता नाही आणि एक उदाहरण म्हणूनच महाराजांनी त्यांना समोर आणलं आहे, तरी या प्रसंगातून आणि या प्रश्नोत्तरातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ‘परमार्था’ची निवड भय्यासाहेबांनी केली म्हणून त्यांचा ‘प्रपंच’ बिघडत गेला, असं कुणाला वाटलं तर तो वेडेपणा आहे. सद्गुरू हा त्रिकालज्ञ असतो. भय्यासाहेबांचा खडतर भविष्यकाळ श्रीमहाराज जाणत होते. प्रारब्धाने काही गोष्टी घडतात आणि त्या टाळण्यापेक्षा त्या ज्याला भोगाव्या लागणार आहेत त्याला कल्पनातीत धैर्य आणि मानसिक शक्ती देणं हीसुद्धा सद्गुरूचीच फार मोठी कृपा असते! जसं भय्यासाहेबांचं महाराजांवर प्रेम होतं तसंच महाराजांचंही होतं. म्हणूनच त्यांनी विचारलं प्रपंच हवा का? सहज आणि तात्काळ उत्तरातून त्यांची परमार्थाची ओढ प्रकटली तेव्हा ते खडतर प्रारब्ध समूळ नष्ट करणारी आंतरिक शक्ती महाराजांनी त्यांना देऊ केली. बाह्य़ परिस्थिती लोकांना खडतर वाटली तरी कोटय़धीशालासुद्धा जे अखंड समाधान दुष्प्राप्य आहे, ते श्रीमहाराजांनी त्यांना अविरत दिलं. समजा मला महाराजांनी विचारलं की, तुम्हाला प्रपंच पाहिजे की परमार्थ? मी उत्तर काय देईन? ऐकायला महाराजांना आवडावं म्हणून, ज्ञानाच्या अंगानं योग्य दिसेल म्हणून मी ‘परमार्थ’ हे उत्तर देईन! माझं खरं उत्तर मात्र नुसतं ‘प्रपंच’ नसेल हो! कारण सततच्या अडचणींचा प्रपंच वाटय़ाला आला तरी त्यात काय आनंद? म्हणून माझं उत्तर, ‘कधीही अडचणीचा नसलेला आणि सतत माझ्या मनाजोगता राहाणारा प्रपंच’ हेच असेल! तरी मी वरकरणी क्षीण आवाजात ‘परमार्थ’ म्हणीन, त्यावर भय्यासाहेबांना जसं महाराजांनी सावध केलं की, ‘पाहा, नीट विचार करा; परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आल्यास हाती चौपदरी घ्यावी लागेल. आहे का तयारी?’ तर मी भांबावूनच जाईन. तरीही उसनं अवसान आणून ‘परमार्थ’ असं पुटपुटेन आणि मग प्रपंचातल्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी महाराजांना साकडं घालत राहीन.