राजेश बोबडे

उत्तम साधनेचा उगम कोणता? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : ‘‘या जगात काही दृश्ये माणसाला गुलाम बनविणारी तर काही दृश्ये त्याला उन्नतीकडे नेणारी अशी आहेत. हे दोन्ही प्रवाह आपापल्यापरीने वाहात आहेत आणि आपण देखील तसेच वाहणारे आहोत. पण आमच्यात ही एक नवी चेतना झळकत आहे की, ‘आपणाला काही उत्तम करावयाचे आहे!’ जीव हा फळे भोगताना परतंत्र बनत असला तरी कर्मे करण्यासाठी तो काही प्रमाणात स्वतंत्र आहे. म्हणूनच संतांनी व ग्रंथांनी त्याला उन्नत होण्याचा आदेश दिला आहे. त्या आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करून जिवाला या वाहत्या कर्मप्रवाहातूनही आत्मविकास करून घेता येणे शक्य आहे. सत्संगतीमुळे हा आत्मविश्वास त्याच्या हृदयात प्रथम जागृत होतो व व्हायला पाहिजे; हीच मुख्य गोष्ट आहे.’’

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई

‘आपण काही उन्नति करावी’ या संबंधी नेटाचा प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे हे सांगताना महाराज म्हणतात, ‘‘ जसा एखादा माणूस ‘आपणाला घर पाहिजे’ हे पटल्यावर त्यासाठी निर्धाराने धडपड करतो व ते मिळवून घेतो, त्यात राहू लागतो व ते सजवून दुसऱ्याला दाखविण्याइतपत सुंदर बनवितो; तसेच अभ्यासाचे महत्त्व जाणून आपण त्याला आरंभ केला पाहिजे आणि आत्म्याच्या पूर्ण विकासाला पात्र झाले पाहिजे.’’

महाराज म्हणतात, ‘‘अभ्यासी माणसाने बाहेरून कितीहि यमनियमादि साधने केली तरी त्यांपासून आत्मानुभवाची प्राप्ति होऊ शकत नाही, असे म्हणणारेही सज्जन आहेत. पण ही साधने करण्याऐवजी वाईट वागल्याने आत्मप्राप्ती होते, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ नाही. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश हाच की, यमनियमांनी बहिरंग वागणूक उत्तम होते यात शंका नाही; पण त्यात रस निर्माण करण्यासाठी साधकाचे पाऊल ज्ञानपूर्वक आत्मदर्शनाच्या उंबरठय़ावरच पडायला पाहिजे. केवळ मधल्या पायऱ्या म्हणजे मुक्काम नव्हे; परंतु मधल्या पायऱ्या वगळून एकदम शिखरावरही जाता यावयाचे नाही. अर्थात् दिनचर्या, व्यवहारशुद्धी, समाजसेवा इत्यादी पायऱ्या दक्षतेने चढूनच आत्मदर्शनाकडे जावे लागेल. त्यासाठी आपले जीवन योजनाबद्ध बनविले पाहिजे आणि समयोचित दिनचर्या आखून तसा काही काळ घालवायलाच पाहिजे. प्रात:काळी उठणे, आपल्या स्थानाची शुद्धी करणे, आपल्या सर्व इंद्रियांना सात्त्विक वळण लावणारे संकल्प करणे, सर्व व्यवहार समाजाशी समरस करणारा किंवा सामंजस्य कायम ठेवणारा, मानवजातीची सेवा घडेल अशा प्रकारचे आचारविचार ठेवणे, कुणालाही आपल्याविषयी चिंता वाटणार नाही अशा नियमांनी वागणे यालाच मी उत्तम साधना समजतो’’ हे स्पष्ट करून महाराज ध्यानाच्या पाठात म्हणतात :

अपने आतम् के चिंतन में, हरदम जागृत रहना है।

ओहं सोहं श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है।

इस मानव-जीवन में इतनी,

मंजिल चढम्कर जाना है।

तुकडय़ादास कहे यह बानी,

रोज-रोज ही गाना है।।