जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती राजकीय भविष्यावर भाष्य करणारी कादंबरी आहे. तिचे वैशिष्ट्य असे की, ती सार्वकालिक आहे. सत्तेचा अतिरेक, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच, मानसिक गुलामी यांविषयी ही कादंबरी गंभीर भाष्य करते, म्हणून ती सतत संदर्भासाठी वापरली जाते.

साथी एस. एम. जोशी यांचा ‘सहस्राचंद्रदर्शन सोहळा’ १९८४ ला साजरा झाला, तेव्हा एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. सर्वश्री मधु लिमये, मधु दंडवते, प्रेम भसीन, बाबा आढाव, भाई वैद्या प्रभृती मान्यवर समाजवादी नेत्यांनी त्याचे संपादन केले होते. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिलेला होता. त्याचे शीर्षक होते ‘राजकीय पक्षपद्धतीची अधोगती’. १९८४ चे हे तर्कतीर्थांचे विचार आज २०२५ ला वाचत असताना जॉर्ज आर्वेलसारखीच सार्वकालिकता अनुभवास येत राहते.

प्रातिनिधिक किंवा संसदीय लोकशाहीमध्ये पर्यायी पक्षपद्धती अस्तित्वात येऊन स्थिर व्हावी लागते. भारतामध्ये निवडणुकीनंतर एक पदच्युत झाला, तर दुसरा पर्यायी पक्ष सत्तेवर यावा, अशी परिस्थिती सध्या नाही आणि नजीकच्या भविष्यकाळी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. कारण, विरोधी पक्षांना सारखे तडे जात आहेत. एका पक्षातून दोन, दोघांचे चार-पाच-सहा असे लहान लहान तुकडे निर्माण होत आहेत. याचे कारण पक्षातील गट, स्पर्धा व वैयक्तिक स्पर्धा, आधुनिक राज्यांच्या ठायी असलेली सत्ता विलक्षण प्रलोभक आहे. सगळ्या तऱ्हेच्या वासनांना आणि मोहांना ती चेतविणारी आहे. पक्षामध्ये अवांतर गट उत्पन्न होतात आणि ते एकमेकांच्या विरुद्ध जळत असतात. एकमेकांचे पाय ओढू लागतात. आयाराम, गयाराम, दलबदलू वाढीस लागले आहेत. ज्या पक्षाची सद्दी असते, त्या पक्षात आयाराम आणि ज्या पक्षाची शक्ती क्षीण झालेली असते, त्यात गयाराम उत्पन्न होतात. सत्तेवर जातात. त्यात लांबूरामांचे चांगले फावते. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खूनही होऊ लागले आहेत. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा खून झाल्यास तिकडे दुर्लक्षही करतात. या ध्येयशून्य व गर्ह्य प्रवृत्ती आज सत्ताधारी पक्षामध्येसुद्धा सारख्या उलटून वर येत आहेत.

यातून सत्तेवर दृढपण रूढ झालेला पक्ष हळूहळू हुकूमशाही प्रवृत्तीचा बनण्याचा धोका वाढू लागला आहे. जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकशाही जीवनपद्धतीचे शिक्षण मिळण्याकरिता सेवा करणाऱ्या व्यक्तीचा राजकीय पक्ष उत्पन्न होण्याची शक्ती कमी झाली आहे. हुकूमशाही की लोकशाही, अशा तऱ्हेचा पेचप्रसंग आज उत्पन्न झालेला आहे. भारतीय लोकशाही धोक्यात सापडली आहे. परंतु, हा धोका सामान्यांच्या मनामध्ये कसलीही चिंता उत्पन्न करीत नाही. याचे कारण, राजकीय पक्षोपपक्ष हे लोकविमुख बनले आहेत.

सत्ताधारी पक्ष विशेषत: आणि विरोधी पक्ष हे अलीकडे हळूहळू गुंडांना जवळ करू लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन प्रादेशिक राज्यांच्या ज्या हकिकती विश्वसनीय व्यक्ती आणि संस्थांकडून बाहेर येत आहेत, त्यावरून सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हे जनतेच्या आर्थिक विवेकबुद्धीवर अवलंबून किंवा विसंबून देशाच्या राजकीय जीवनाला सामर्थ्य देत नाहीत, हे स्पष्ट होते. अनेक गुन्हेगार-गुंड राजकीय सत्तेची केंद्रस्थाने काबीज करू लागले आहेत, निवडणुकीत विजयी होत आहेत. जे गुन्हेगार नाहीत, अशा राजकीय राज्यकर्त्यांनाही त्यांचा आधार आवश्यक वाटू लागला आहे. गेली ५-६ वर्षे लोकसभा व राज्यसभा यांच्यामध्ये सध्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचे वर्तन सभ्यतेच्या मर्यादांचा कित्येक प्रसंगी भंग करते. प्रचंड कोलाहल माजतो. अनेक सदस्य एकदम उठतात, बोलतात, आरडाओरडा चालू राहतो. वस्तुत: मोठ्या बहुमतात असलेल्या सत्ताधाऱ्यांची सभ्यता राखणे ही मुख्य जबाबदारी, तीच त्यांना पेलवत नाही, असे वारंवार सिद्ध झाले आहे.

वस्तुत: मूलगामी लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाही परिणत होणे, हे समाजाच्या राजकीय विकासाचे उद्दिष्ट आहे. परंतु, या उद्दिष्टाच्या दिशेने राजकीय पक्षांची वाटचाल सुरू नाही. म्हणून असे म्हणावे लागते की, एकंदरीत संसदीय लोकशाही धोक्यात सापडली आहे. कारण राजकीय पक्षपद्धतीचा ऱ्हास व अधोगती होऊ लागली आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com