अगदी आता आतापर्यंत ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना मिळणारी कोटय़वधींची पॅकेजेस, एका विद्यार्थ्यांला तीन-चार कंपन्यांनी गलेलठ्ठ पगारासह देऊ केलेली नोकऱ्यांची निमंत्रणे, असे बातम्यांचे ठरलेले विषय असायचे. देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांचा लौकिक ‘सुपर रोजगारक्षम’ विद्यार्थ्यांमुळे कायमच वृद्धिंगत होत गेला असला तरी अलीकडे मात्र तो डागाळतो की काय, असे चित्र निर्माण होत आहे. ‘आयआयटींमधील अतिप्रतिष्ठित आयआयटी’ समजल्या जाणाऱ्या आयआयटी-मुंबईसारख्या संस्थेत यंदा नोकरभरतीचे (कॅम्पस प्लेसमेंट) आकडे फार कमी आहेत. आयआयटी-मुंबईतील २०२४ च्या नोकरभरतीसाठी नोंदणी केलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांपैकी ७१२ म्हणजे तब्बल ३६ टक्के विद्यार्थ्यांना यंदा अद्याप नोकरीच मिळालेली नाही. या नोकरभरतीचा हंगाम मे-जूनपर्यंत असतो, त्यामुळे त्यांना अजूनही संधी आहे. मात्र, एरवी डिसेंबरमध्ये होणाऱ्या नोकरभरतीच्या पहिल्याच टप्प्यात चांगल्या भरतीचा लौकिक असताना, यंदा मात्र मार्च उलटूनही नोकरीविना राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६ टक्के असणे, हा चर्चेचा मुद्दा आहे. देशभरातील २३ आयआयटींमध्ये थोडय़ाफार फरकाने यंदा हेच चित्र असल्याचे निरीक्षण आहे.

एरवी डिसेंबरमध्ये नोकरभरतीचा पहिला टप्पा पार पडल्यावर विद्यार्थ्यांना मिळालेल्या पॅकेजचा मोठा गवगवा करणाऱ्या अनेक आयआयटींनी यंदा त्याबाबत चुप्पीच साधली होती. कारण एक तर मोठय़ा प्रमाणात भरतीच झाली नाही आणि दुसरे म्हणजे ऑफर मिळालेल्यांचे सरासरी पॅकेज इतके कमी होते, की अनेक आयआयटींना ते न सांगणेच उचित वाटले असावे. उदाहरणच द्यायचे, तर ‘इंडियन एक्स्प्रेस’ने जानेवारी २०२४ मध्ये दिलेल्या वृत्तात आयआयटी-दिल्लीच्या डिसेंबरमधील भरतीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, यंदा १०५० विद्यार्थ्यांची पहिल्या टप्प्यात भरती झाली. गेल्या वर्षी ही संख्या १३०० होती. यात आणखी एक मुद्दा असा, की १०५० मध्ये केवळ थेट भरती झालेले नव्हते, तर भरतीआधीच्या उमेदवारीसाठी निवडण्यात आलेल्यांचाही या संख्येत समावेश होता. 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth institute like iit mumbai has very less campus placement figures for recruitment amy
First published on: 04-04-2024 at 00:02 IST