अनेकदा गाणे ऐकूनही ही ओळ ‘ऐकायची’ कशी काय निसटली, असे स्लोअरला वाटले. ‘पाहिले तर इथेच आहे, शोधले तर कुठेही नाही.’ क्षणांचे हे असे निसटलेपण आपल्या नीट लक्षातच आलेले नव्हते. तो स्वत:च्याच मनाशी म्हणता झाला. हे स्वत:शी जे काही चालले होते, त्याची मग त्याने आपल्या रोजदिनीत नोंद केली…

‘हिंदी चित्रपटांतील जुनी गाणी ही गाडीच्या आरशात दिसणाऱ्या, पण मागे पडत जाणाऱ्या प्रतिबिंबांप्रमाणे आपला पाठलाग करत राहतात…’ विचारांची एकामागोमाग एक आवर्तनं करून थकल्यानंतरही स्लोअर शहाणेला स्वत:च्या मनाला काही सांगावेसे वाटे, तेव्हाच्या एका मौनक्षणी त्याला हे वाक्य सुचले होते. रोजदिनीच्या एका तारखेखाली कित्येक महिने हे एवढेच वाक्य त्याने लिहून ठेवले होते. मौनवाक्य! स्लोअर शहाणेच्या विचार करायच्या अनेक तऱ्हांपैकी ही एक तऱ्हा. सोलिलुक्वीशी होणारा संवाद मनातल्या मनात असला, तरी तो करताना स्लोअरचा चेहरा संवादातील वाक्यांनुसार विलक्षण बदलायचा. मौन वाक्यांच्या वेळी हे असे होत नसे. अशा वेळी स्लोअरच्या चेहऱ्याच्या वरच्या स्तरातील त्वचेला निर्विकारपणा चिकटे. पण, हा निर्विकारपणा आतल्या पदरांपर्यंत न झिरपता तिथल्या अंतर्त्वचेवर मात्र ओरखड्याची एक खूण उमटलेली असेच. म्हणजे स्लोअरला दुरून कोणी पाहिले, तर तो छत्री हातात धरून बाहेरचा पाऊस बघतो आहे, असे वाटे. पण, त्याला मात्र आतमध्ये मनभर पसरणाऱ्या पावसाने ओले झाल्याचे, जिव्हाळी लागल्याचे जाणवत राही. मौन वाक्यांच्या झडीच्या झडी त्याच्या पापण्यांआड पडदे उभारून त्यावर त्याला त्याचाच सिनेमा दाखवीत. तर्काची फिरकी घेणाऱ्या कल्पनांशी अशी लपाछपी खेळण्याची एक सवयच त्याला यानिमित्ताने लागून गेली होती. ते वरचे वाक्यही स्लोअरला असाच एक सिनेमा पाहताना सुचले होते.

त्याचे झाले असे, की स्लोअर शहाणे त्याच्या ‘मित्रां’बरोबर एकदा पावसाळी ट्रिपला गेला. ही साधारण तो कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. पावसाळ्यात किमान दोन दिवस एका तरी ट्रिपला जायचे, हा नियम मध्यम वर्गाच्या दैनंदिनीत अपवाद म्हणूनही मोडला न जाण्यास सुरुवात होण्याचा, म्हणजे नव्वदच्या दशकाच्या मध्यावरचा हा काळ. अशा ट्रिपला जाणे हा जसा नियम असतो, तसे अशा ट्रिपमध्ये काय काय करायचे, याचेही काही नियम असायचे – आता त्या काळापेक्षा वेगळे, पण अजूनही असतात. पावसाळी सहल असल्याने सहलीसाठी पावसाळीच ठिकाण निवडले गेले. अशा ठिकाणी जाऊन भिजणे, हसणे, खिदळणे, नाचणे, खाणे, खेळणे, जागणे अशी क्रियापदे सार्थ ठरविण्यासाठी जे जे करावे लागते, ते ते सर्व स्लोअर आणि त्याच्या ‘मित्रां’नी केले. हे सगळे केल्याने खरे तर नियमाचे पूर्णांशाने पालन झाले होते. पण, ‘फिरणे’ या क्रियापदासाठीच्या कृती करतानाच्या एका बेसावध क्षणी स्लोअरच्या एका ‘मित्रा’ला नियमाला अपवाद करण्याचा मोह झाला. त्याने स्लोअरला लिहिणे या क्रियापदाशी संबंधित काही तरी करू या का, असा प्रश्न केला. आता स्लोअर शहाणे हा ना लेखक होता, ना कवी. उलट अक्षरांच्या मुसळधार गुहेत त्याला कानकोंडलेच अधिक होई. पण, बाहेर कोसळणाऱ्या पावसामुळे म्हणा किंवा आत जाणवलेल्या ओलेपणामुळे म्हणा, स्लोअरला शब्दांची असोशी वाटली. तो ‘मित्रा’ला म्हणाला, ‘वातावरण छान आहे, कविता लिहू. कवी अशाच वेळी कविता लिहितात, असे मीही ऐकून आहे.’ ‘मित्रा’लाही कल्पना पसंत पडली आणि ‘मी एक वाक्य, मग तू एक वाक्य’ अशी कविता लिहू असे त्याने सुचवले. स्लोअरही शहारला. त्याला एकदम आकाशावर समास सोडून त्याच्या शेजारी काही लिहायला आपल्याला आता ओळी सुचणार असे वाटू लागले. काहीबाही सुचलेही. कविता तयार करतेवेळी स्लोअर आणि त्याच्या ‘मित्रा’त जो संवाद झाला, तो पुसटपणे असा होता…

स्लोअर : निळे, निळे, निळे सगळे

मित्र : त्याला डकवले काळे डगले

स्लोअर : डगले झाले सगळे ‘ढग’ळे

मित्र : ते सोडून पाऊस कोसळे

स्लोअर : बरसण्याचे हे किती सोहळे

मित्र : न तुला कळे, न मला आकळे

‘मित्रा’च्या या ओळीनंतर मात्र स्लोअरला काही सुचलेच नाही. त्याचे शब्द आटून गेल्यासारखे झाले. बाहेर पाऊसही थांबला आणि या संवादात ‘मित्र’ही. बराच वेळ स्लोअर त्याच्या खोलीतल्या गादीवर थिजल्यासारखा शुष्क उताणा पडून राहिला. पंख्याकडे लावलेली त्याची नजर हलत नव्हती. हवेत गारवा असल्याने पंखा चालू नव्हता आणि त्याची पाती स्थिर होती. त्यामुळे तर स्लोअरला आणखीनच थिजल्यासारखे झाले. डोळे तेवढे एका कोनातून दुसऱ्या कोनात वळवून त्याने आजूबाजूला कुणी आहे का, ते पाहिले. उत्साह, उत्फुल्लता आणि उत्कंठा यांपैकी कोणत्याच ‘मित्रां’चे अस्तित्व त्याला कोणत्याच कोनात जाणवले नाही. ज्याच्याबरोबर कविता केली, त्या मित्राचेही नाव स्मृतींवर कितीही जोर दिला, तरी आठवेना. या जोरकस प्रयत्नांमुळे थकून स्लोअरला आणखी थिजलेपण आले. त्यातच मरगळही त्याला नाकारून आळसाबरोबर गेली. त्यामुळे मात्र स्लोअर अगदी अवस्थाहीन एकटा होऊन गेला. निरंक.

असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. पण, स्लोअरला आपली थिजलेपणाची अवस्था सुटताना जाणवले, की आपल्या मनाला गुदगुल्या होत आहेत. हिंदी चित्रपटातले एक गाणे दुरून कुठून तरी ऐकू आल्याने त्या झाल्या आहेत. त्याने मग कानाला जोर लावून ते गाणे ऐकायचा प्रयत्न केला. ‘आनेवाला पल जानेवाला है’ अशाच ओळी होत्या. तो ऐकत राहिला. पहिल्या कडव्याच्या शेवटी शेवटी ओळ आली, ‘देखा तो यहीं है, ढूँढा तो नहीं है।’ अनेकदा गाणे ऐकूनही ही ओळ ‘ऐकायची’ कशी काय निसटली, असे स्लोअरला वाटले. ‘पाहिले तर इथेच आहे, शोधले तर कुठेही नाही.’ क्षणांचे हे असे निसटलेपण आपल्या नीट लक्षातच आलेले नव्हते. स्लोअर स्वत:च्याच मनाशी म्हणता झाला. हे स्वत:शी जे काही चालले होते, त्याची मग स्लोअरने आपल्या रोजदिनीत नोंद केली. त्या नोंदीतील पहिले, शेवटचे आणि एकमेव वाक्य होते, ‘हिंदी चित्रपटांतील जुनी गाणी ही गाडीच्या आरशात दिसणाऱ्या, पण मागे पडत जाणाऱ्या प्रतिबिंबांप्रमाणे आपला पाठलाग करत राहतात…’

कॉलेजच्या दिवसांनंतरही स्लोअर ‘मित्रां’बरोबर ट्रिपला जात राहिला. आता त्यात अधिकाधिक संपन्नता येत गेली. सार्वजनिक एसटीऐवजी स्वत:ची कार आली, राहायची खोली परवडण्यापेक्षा ‘हायजिन’, ‘कम्फर्ट’ अशा गोष्टींवर ठरू लागली आणि प्रवासही ‘प्रवास’ न राहता इथून तेथे व तेथून इथे पोचणे झाले. या दोन पोचण्यांच्या मधल्या काळात जे व्हायचे, त्यालाच मग ‘फिरणे’ म्हटले जाऊ लागल्याने नियमाला अपवाद राहिलाच नाही आणि त्या ‘मित्रा’चे नाव पुन्हा एकदा स्लोअरला आठवलेच नाही. पार पाडलेल्या सर्व गोष्टींच्या समोरील चौकटींत बरोबरच्या खुणा करायला मग स्लोअरही हळूहळू शिकला आणि कविता मागे पडली. ती तशीही ‘मित्र’ ज्या वेळी थांबला, त्याच वेळी समाप्तीकडे चाललीच होती. स्लोअरला याची जाणीव होईपर्यंत अंमळ बराच वेळ गेला, इतकेच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाच एका ट्रिपवरून येताना स्लोअरला गाडीच्या आरशात मागे पडत चाललेली प्रतिबिंबे पाहून पुन्हा त्या ‘मित्रा’ची आठवण झाली. आता त्याला गाणे ऐकू येत होते, ‘जिंदगी का सफर, है ये कैसा सफर…’ यातल्याही पहिल्याच कडव्याच्या शेवटी येणारी ओळ आपल्याला इतके दिवस कशी लक्षात आली नाही, असे वाटल्याने स्लोअर अस्वस्थ झाला. ओळ होती, ‘जायेंगे, पर किधर?’ ही केवळ कविता पूर्ण करण्यासाठीची ओळ नसून, आपल्या ‘कॉन्शस’ला विचारलेला प्रश्न असल्याचे आता त्याच्या उमजेच्या प्रतलावर हळूहळू उमटू लागले. याच उमटण्याच्या उन्मनी क्षणी त्याने या प्रश्नार्थक ओळीचे मनातल्या मनात उत्तर दिले, ‘न तुला कळे, न मला आकळे’. आणि त्याला मित्राचे नाव आठवले…, ‘मौन’!