मुंबई विद्यापीठाच्या ‘सेनापती बापट व्याख्यानमाले’त १९७६ ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दोन व्याख्याने दिली होती. त्यांचे विषय होते- १) धर्माच्या विविध व्याख्या, उपपत्ती व आविष्कार, २) धार्मिक तत्त्वज्ञाने व मोक्षमार्ग. १९७९ ला तर्कतीर्थांनी या विषयांचा विस्तार करत याच व्याख्यानमालेअंतर्गत तिसरे व्याख्यान दिले. त्याचा विषय होता ‘धर्माचे मानसशास्त्र व समाजशास्त्र.’ प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईमार्फत १९८४ मध्ये ‘हिंदू धर्माची समीक्षा व सर्वधर्मसमीक्षा’ असा संयुक्त ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. त्यातील ‘सर्वधर्मसमीक्षा’ ग्रंथात पहिली दोन व्याख्यानेच अंतर्भूत आहेत. १९८४ ला प्रकाशन होऊनही १९७९ चे तिसरे व्याख्यान का समाविष्ट केले नाही, याचा उलगडा होत नाही. ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’मधील तिसरा खंड हा ‘भाषणसंग्रह (धर्म)’ असून, त्यात मात्र या तीन भाषणांचा एकत्रित विचार करून ‘सर्वधर्मसमीक्षा’ची मीमांसा केली आहे.

त्यानुसार ‘धर्माच्या विविध व्याख्या, उपपत्ती व विविध आविष्कार’ या पहिल्या व्याख्यानात तर्कतीर्थांनी धर्माच्या उगम, व्याख्या, उपपत्ती, विविध रूपे (विभिन्न धर्म) इत्यादींबद्दल समग्र परंतु साक्षेपी विवेचन केले आहे. आदिमानव अवस्थेतील समाजात मनुष्य प्रसंगी भयग्रस्त व अचंबित असे. अशा संकटमोचक स्थितीत तो करुणा भाकत असे. ही संकटे अर्थातच विजांचा कडकडाट, पूर, भूकंप, वणवा इत्यादी रूपांची असत. ही संकटे अलौकिकशक्ती निर्माण करते, असा त्याचा समज होता. या असाहाय्य भावस्थितीतून प्राथमिक देवतत्त्व व धर्म उदयाला आले. चिनी, हिंदू, ख्रिाश्चन, बौद्ध, जैन, यहुदी, इस्लाम या सर्व धर्मांच्या स्थापनेमागे हा समान भाव दिसून येतो. सुमारे पाच हजार वर्षांचा धर्मेतिहास रूढी, परंपरा, कर्मकांड, ग्रंथ इत्यादींच्या आधारे आपला प्रभाव विज्ञानयुगानंतरही राखून आहे, त्याचे कारण धर्मामागील मानसशास्त्र, समाजशास्त्र, अंधश्रद्धा, धर्माचार होय. धर्म नाही असा जगात मानव समाज नसणे, हे धर्माचे स्वरूप मानवाच्या विचारांपेक्षा भाव-भावनांवर अधिक आधारित आहे, हे स्पष्ट करते. धर्मांतर्गत असलेले आत्म्याचे अलौकिकत्व, देवांचे अमरत्व, परलोक, पाप-पुण्य, पूर्वजन्म-पुनर्जन्म, कर्मकांड इत्यादी अंधश्रद्धांतून निर्माण झालेल्या गोष्टी होत. विज्ञान व बुद्धिप्रामाण्य, विवेक इत्यादींचा विचार करता धर्माभ्यासाच्या आधुनिक पद्धती पुढे आल्या आहेत – १) धर्मस्वरूप समजून घेणे, २) धर्मतत्त्वज्ञान जाणून घेणे, ३) विविध ज्ञान-विज्ञानांच्या आधारे धर्मचिकित्सा करणे, ४) धर्म व विज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्षात पोहोचणे. विविध धर्मस्वरूपांचा विचार करता जगातील धर्म तीन प्रकारचे आहेत- १) विधिप्रधान, २) प्रकटनप्रधान, ३) साक्षात्कारप्रधान. अंतिमत: लक्षात येणारी गोष्ट म्हणजे सदाचार हाच खरा धर्म होय.

दुसरे व्याख्यान ‘धार्मिक तत्त्वज्ञाने व मोक्षमार्ग’मधून स्पष्ट होते की, धर्मतत्त्वज्ञानात विश्वरचना, देवविज्ञान, परलोक गतिशास्त्राचा विचार होतो. जीव, जगत्, ईश्वर संबंधांबाबत अनेक विचारधारा धर्मा-धर्मांमध्ये विविध रूपांत अस्तित्वात आहेत. मोक्षसंबंधी विचार व मार्गही भिन्न आहेत. एकाच धर्मात एकाच तत्त्व, विचारांचे वैविध्य आहे. प्रथम धर्म जन्मतो, मग त्याची समीक्षा जन्मते. धर्म, अर्थ, काम, मोक्षसंबंधी संकल्पना धर्मनिहाय भिन्न आहेत. त्यामुळे धर्माचे एकच एक रूप नाही. तर्कतीर्थांनी आपल्या या व्याख्यानात धर्मासंबंधी काही अनुत्तरित प्रश्नांचा ऊहापोह केला आहे. विविधवाद चर्चा हे या व्याख्यानाचे वैशिष्ट्य होय. एकेश्वरवाद, बहुदेववाद, अवतारवादाची ईश्वरूप चर्चा यात आहे नि द्वैतवाद, अव्दैतवाद, विशिष्टाद्वैतवाद इ. जीव-ईश्वरसंबंधी चर्चाही.

तिसरे व्याख्यान धर्माचे मानसशास्त्र व समाजशास्त्र समजावेत. हा धर्मअभ्यासाचा आधुनिक मार्ग होय. तो धर्माचार, धर्मभाव, धर्मबुद्धी इत्यादींचा विचार इहवाद, मानसशास्त्र, समाजआचरण असा विचार करत पूर्ण समाधान म्हणजे काय? ते शक्य आहे काय? याचाही यात विचार आहे. तर्कतीर्थ या ग्रंथातून समग्रत: या निष्कर्षास पोहोचतात की, माणसाचा जसा पिंड, तसा त्याचा व्यवहार. धर्माचे स्वरूप व चिकित्सा कालौघात बदलत राहते; पण धर्मनिर्मिती निर्वेध जीवनाच्या कांक्षेतून झाली असून, सदाचार हाच धर्म व मोक्ष होय. तो सर्व धर्मांमध्ये समभावाने आढळतो.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com