अतुल सुलाखे
सद्बुद्धीने मांडलेल्या एखाद्या संकल्पनेमागील तत्त्वाचे स्मरण उरले नसेल तर ती संकल्पना नव्या समस्यांना जन्म देते. सहकाराच्या संकल्पनेचे आजचे चित्र हे अशा घसरणीचे उत्तम उदाहरण आहे. असाच दुसरा शब्द आहे ‘विकेंद्रीकरण’ या संकल्पनेवर विनोबांनी मौलिक विवेचन केले आहे.
विनोबांच्या मते, विकेंद्रीकरण हा शब्द आणि संकल्पना आपल्यासाठी नवीन आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित कोणत्याही भल्याबुऱ्या भावना नाहीत. यावर कुणी म्हणेल यंत्रयुगाच्या पूर्वी सारे काही विकेंद्रितच होते तेव्हाच्या आणि आताच्या अर्थात काय फरक आहे? ते विकेंद्रीकरण नव्हते का? ग्रामव्यवस्थेला सर्वोदयात असणारी मान्यता ध्यानी घेतली तर हा सवाल उचित म्हणावा लागतो.
यावर विनोबांची टिप्पणी अशी की यंत्रयुग येण्यापूर्वी व्यवस्था विकेंद्रित होती, पण विकेंद्रीकरण नव्हते. खेडोपाडी, सारे उद्योग विकेंद्रित रूपात सुरू आहेत म्हणून तेवढय़ाने विकेंद्रीकरण होत नाही. विकेंद्रीकरणात विकेंद्रित उद्योगाबरोबर समग्र दृष्टीची एक व्यापक योजना गृहीत असते. अशी व्यवस्था नसेल तर विकेंद्रित उद्योग म्हणजे विखुरलेले उद्योग एवढाच अर्थ असतो.
यंत्रयुगापूर्वी असे विखुरलेले उद्योग होते यंत्रयुगाच्या पहिल्या फटक्यातच ते मोडकळीस आले. अस्सल विकेंद्रीकरण असे मोडून पडत नाही. उलट ते यंत्रांना मोडीत काढते.
विकेंद्रीकरणाचा विशेष सांगितल्यावर विनोबा आधुनिक यंत्र युगाची मर्यादा आपल्यासमोर ठेवतात. ‘आजचे यंत्रयुग अत्यंत अयंत्रित आहे,’ हे त्यांचे मत पुरेसे स्पष्ट आहे. अयंत्रित उद्योग कुणालाच नको असतात म्हणून ‘सुयंत्रित यंत्रयुगा’ साठी प्रयत्न होतात. तथापि शस्त्रांप्रमाणेच यंत्रेही मानवानेच शोधलेली असल्याने त्यांचे मानवीकरण एका टप्प्यापर्यंतच होऊ शकते. अंतिमत: तीच माणसाला खेळवतात हे विनोबांचे मत आहे.
विनोबांचे शस्त्रे आणि यंत्रे यांचे आकलन त्यांच्या यंत्र विवेकाला साजेसे असेच आहे. त्यांच्या दृष्टीने शस्त्रे म्हणजे विध्वंसक शस्त्रे. एखाद्या सर्जनच्या हातातील चाकू आणि मशीनगन यातील फरक ते जाणतात.
शस्त्रे जशी विध्वंसक तशीच यंत्रेही विध्वंसक असतात. माणसाला बेकार, आळशी आणि जड बनवणारी यंत्रे ही विध्वंसक आणि लुटारू असतात हे त्यांचे प्रतिपादन आहे.
मानवी स्वभावाने ‘भावित’ झालेली अवजारे आणि हत्यारे त्यांना रक्षणीय वाटतात. उदा. विहीर खोदायचे यंत्र. ग्रामीण भागात ते कितीतरी उपयोगी असते. विनोबा अशा यंत्रांचे स्वागत करतात, पण त्यांना या उपयुक्त यंत्रांवरचे अवलंबित्व एका मर्यादेनंतर नको वाटते. परंतु हे मानवाला उपयोगी असणारे यंत्र युग एका मर्यादेपर्यंतच त्यांना मान्य आहे. या यंत्रयुगाचा पराभव अशा उपयुक्त यंत्रांची मदत घेऊन विकेंद्रीकरणाचे ध्येय समोर ठेवून करायचा आहे.
विनोबांची यंत्रांबाबतची भूमिका आक्रस्ताळी नाही एवढेच नव्हे तर जुनी व्यवस्था कवटाळणारीही नाही. त्यांच्या विचारात आणि मांडणीत स्पष्टता आहे. त्यांना अमानवी यंत्रे नकोत आणि केव्हाही कोसळतील असे विखुरलेले उद्योगही नकोत. ते उपयुक्त यंत्रांची मदत घेऊन विकेंद्रीकरणाचे ध्येय गाठू इच्छितात.
jayjagat24 @gmail.com