‘येथे मोठय़ा संख्येने जमलेल्या तमाम स्नेहीगळूंनो, आपल्या जगज्जेत्या पक्षाचे लाडके व लोकप्रिय अध्यक्ष नलीनकुमार कटिल यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो. रस्ते, गटारे, सांडपाण्याची व्यवस्था यापेक्षा लव्ह जिहाद कन्नडिगांसाठी महत्त्वाचा असे विधान करून त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. हा लव्ह जिहाद नष्ट केल्याशिवाय, देशापुढला मोठ्ठा प्रश्न ठेचून काढल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी सामूहिक प्रतिज्ञा करण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे येत्या काळात किमान निवडणुका होईपर्यंत तरी नागरी समस्या घेऊन कुणी आलेच तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. चांगले रस्ते नसले तरी काही बिघडत नाही. फार फार तर अपघातांची संख्या वाढेल व थोडी जास्त माणसे जातील. मात्र आपली एक कन्या जरी या लव्ह जिहादच्या सापळय़ात अडकली तर आपला अख्खा धर्म संकटात येतो!’ मंगळूरु किंवा तत्सम कुठल्याशा कर्नाटकी शहरातल्या पक्ष कार्यालयात चाललेले ते युवा मोर्चाच्या कुणा नेत्याचे भाषण होते कन्नडमध्ये, पण त्याचा अर्थ हा असाच असणार याबद्दल आम्हाला बालंबाल खात्री होती. त्या खात्रीनेच आम्ही पुढले भाषण ऐकू लागलो.. ‘रस्तेच चांगले नसतील तर पुलांचा प्रश्नच येत नाही. तसाही पुलांचा उपयोग काय? तो नसेल तर होडीने प्रवास करता येतो. मध्यंतरी गुजरातेत झुलत्या पुलाला अधांतरी लटकून बरीच माणसे गेली. पण त्याचा आपल्या यशावर काही परिणाम झाला का? नाही- गुजरातमध्येही नाही. म्हणूनच सांगतो, जिवंत वा मृत माणसांपेक्षा धर्म महत्त्वाचा. तो लव्ह जिहादसारख्या घटनांमुळे अधांतरी लटकायला नको याची काळजी सर्वाना घ्यायची आहे. सांडपाणी वाहून नेणारी गटारे नसली किंवा असलेली गटारे तुंबली तरी त्याने काही फरक पडत नाही. फार तर डासांचे प्रमाण वाढेल. मलेरिया होईल.आणखी काही माणसे जातील. करोनात तरी काय झाले वेगळे! त्याचासुद्धा आपल्या विजयावर झाला का? नाही! यित्कचितही परिणाम झाला नाही, कारण त्यापेक्षा मोठा साथीचा रोग लव्ह जिहाद आहे. तो पसरला तर आपला धर्म संकटात येईल, त्यामुळे देशाची प्रगतीच धोक्यात येईल. तेव्हा जिहादची प्रकरणे शोधून काढण्यासाठी आपल्याला आता आकाशपाताळ एक करायचे आहे हे ध्यानात असू द्या. निवडणुकीचा मोसम बघून आता लोक आपल्याकडे रस्ते, गटारे यांच्या बांधकामासाठी येतील. लोकशाहीने लोकांना लावलेली ही वाईट सवय मोडून काढण्याची मोठी संधी कटिलसाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिली आहे. या समस्यांपेक्षा लव्ह जिहादच्या रूपाने धर्मावर आलेले संकट महत्त्वाचे असे गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या लोकांना पटवून द्या. वारंवार सांगूनही जे ऐकणार नाहीत त्यांना धर्मभ्रष्ट ठरवून मोकळे व्हा! शाळा, कॉलेज, व लव्ह जिहादचा धोका असलेल्या वस्त्या यांवर गिधाडासारखे लक्ष ठेवा. नमश्कारा!’ ..लव्ह जिहाद ठेचून विकास घडवण्याचे हे आवाहन कदाचित काहींना पटेल, आपण कोणाला रोखणार आणि कसे? पण एक बरे की, यामुळे बहुधा बेळगावचा प्रश्न आता तरी नेहमीसारखा मागे पडेल! तेवढेच समाधान!!