लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी यांचे एक पुस्तक आहे. ‘सभेत कसे बोलावे?’. या ग्रंथात त्यांनी काही आदर्श भाषणसंहिता संग्रहित केल्या आहेत, त्यांपैकी एक भाषण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे आहे. त्याचे शीर्षक आहे ‘आचार्य अत्रे : विनोद सामर्थ्याची प्रचीती’. आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुंबईत १३ ऑगस्ट १९८० रोजी त्यांच्या ८२ व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्ष तर्कतीर्थ होते. त्यांनी आपल्या या भाषणात आचार्य अत्रेंच्या आणि आपल्या मतभेदपूर्ण मैत्रीवर प्रकाश टाकला आहे. तद्वतच त्यांचे विनोद सामर्थ्य अधोरेखित केले आहे.

आपल्या या अध्यक्षीय भाषणात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा आणि आचार्य अत्रे यांचा जुना ऋणानुबंध होता. तो दुहेरी होता. हे उभयता एकमेकांच्या बाजूचे आहेत की विरुद्ध, असा संभ्रम निर्माण व्हावा, असे हे नाते होते. आचार्य अत्रे तर्कतीर्थांवर हल्ला चढवीत. लोक उत्तराचा आग्रह करीत. तर्कतीर्थ मौन पाळत.

आचार्य अत्रेंचा ‘ब्रँडीची बाटली’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील भगवान श्रीकृष्णाचे चित्रण वादग्रस्त ठरले. पुण्यातील माटे मास्तर (श्री. म.), मराठे प्रभृतींनी निषेध सभा आयोजित केली. त्या सभेचे अध्यक्ष तर्कतीर्थ. ही गोष्ट १९३७-३८ ची. त्याकाळी तर्कतीर्थ सोवळ्या ब्राह्मणाप्रमाणे शेंडी, जानवे, उपरणे अशा रूपात पुण्यात वावरत. तर्कतीर्थांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आचार्य अत्रे यांचे साधार समर्थन केले. माटे मास्तर मात्र बुचकळयात पडले खरे.

हैदराबाद येथे झालेल्या एका मराठी साहित्य संमेलनात स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर तयार केलेला ‘पदनाम कोश’ हा ‘बदनाम कोश’ असल्याची टीका केली. या टीकेनंतर तर्कतीर्थांनी उत्तर देणारे भाषण केले. त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, ‘‘आचार्य अत्रे यांच्याकडे जी शस्त्रे आहेत, ती मजकडे नाहीत. माझ्याकडे शास्त्रे आहेत. शास्त्रे ही शस्त्रे आहेत. शब्दशास्त्राचे ते अधिकारी आहेत. परंतु, शास्त्रात शब्द कमी, अर्थ जास्त असतो.’’ तथाकथित बदनाम कोश खरे तर शुभनाम कोश आहे. जी माणसे व देश मातृभाषा वापरत नाहीत, ते देश कधीही वर येणार नाहीत, असे सांगत तर तर्कतीर्थांनी आचार्य अत्रे यांना निरुत्तर केले होते.

राजकारण आणि साहित्यातील मैत्रीत अंतर असते. राजकारणात आकाशातील ढगांप्रमाणे मित्र व शत्रू बनत असतात. साहित्यकारांचे तसे नसते. त्यांना विश्वमैत्री हवी असते. या मैत्रीत करुणा, मुदिता (आनंद), उपेक्षा सारे असते. ही मैत्री सार्वभौम असते. त्याला अपवाद नसतात. श्रेष्ठ साधूंच्या आणि साहित्यकारांच्या ठिकाणी तादात्म्य वृत्ती असते व ती वृत्ती आणि माणुसकीचा जिव्हाळा अत्रे यांच्याकडे फार मोठा होता. त्यांची महाराष्ट्राप्रति निष्ठा, भारताप्रति निष्ठा व मानवनिष्ठा विलक्षण होती. त्यांची कॉम्रेड डांगे यांच्याशी जशी मैत्री होती, तशीच ती डॉ. आंबेडकर यांच्याशीही होती.

आचार्य अत्रे यांचे साहित्य विनोदी आहे. विनोदी साहित्य हे लिहिण्यास सर्वांत कठीण साहित्य आहे. विनोदी वृत्ती माणसाला द्वंद्वातून बाहेर काढते. सुखाच्या बंधनात पडू देत नाही. दु:खातूनही बाहेर काढते. विनोदाचे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे अनेक प्रकार आहेत. गांधील माशीचा चावरा विनोद आणि मधमाशीचा मधुर विनोद निर्माण करण्यास ताकद लागते. श्रेष्ठ विनोद माणसाला पराभवातून बाहेर काढतो. विजयाच्या बंधनातून बाहेर काढतो. विनोदाच्या सामर्थ्याची प्रचीती असलेले आचार्य अत्रे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर रंगांचे अष्टपैलू झुंबर होते. ते पेटविले म्हणजे प्रकाश कसा आसमंतात पसरतो, तसे होते आणि म्हणून त्यांच्या मोठेपणाने आपण भारावून जातो, राग विसरतो, चिरंतन मैत्रीचा ठेवा जतन करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर्कतीर्थांचे हे भाषण म्हणजे नर्म विनोद आणि विचार यांच्या सुरेख संगमाचे उदाहरण होते, म्हणून माधव गडकरी यांनी या भाषणाची संहिता आपल्या ग्रंथात समाविष्ट केली होती. तर्कतीर्थांच्या सर्व भाषणांत त्यांचे स्वत:चे स्वतंत्र, अनोखे आकलन असे. म्हणूनच ते ‘महाराष्ट्र प्रबोधक’ होते. drsklawate@gmail.com